बारामती-पूर्वी बारामतीत मत मागत असताना एक लेव्हल होती, पण आता ती लेव्हल सोडली जात आहे. भावनिक केलं जात आहे. नुसतं संसदेत भाषण देऊन विकासकामे होत नाही, त्यासाठी निधी आणावा लागतो, असे म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. तर तुम्ही साहेबांना (शरद पवार) निवडून दिले, त्यांच्या मुलीला निवडून दिले आता सुनेत्रा पवारांना निवडून द्या, पवार आडनावाच्या उमेदवारालाच विजयी करा, अशी साद देखील अजित पवार यांनी बारामतीकरांना घातली.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, काही लोक संसदेत चांगल बोलतात म्हणजे विकास होत नाही. मी देखील भाषणात पटाईत आहे. माझा देखील पट्टी लागली तर मी भाषणही करतो अन् निधीही आणतो, कामही करतो तर एखादे काम वाजवून देखील पूर्ण करून घेतो, मतदान मागताना आता काही लोक तुम्हाला भाननिक करत आहेत, पण बारामतीच्या विकासासाठी तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचा आहे, असे म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंसह शरद पवारांना टोला लगावला.
अजित पवार पुढे म्हणाले की, मी काम करत असताना माझ्यावर काही कार्यकर्ते नाराज आहे. सगळेच खूश आहेत असे मी म्हणत नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा त्यात मी मार्ग काढेन. माझ्याबरोबर काम करणारा चूकला म्हणून त्याचा दंड मला किंवा उमेदवाराला देऊ नका, अशीही साद अजित पवारांनी घातली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मला बारामतीकरांनी सात सात वेळा मला निवडून दिल्याने मला बारकावे मला माहित झाले. त्यासाठी जरी रोज तुम्हाला भेट नसलो तरी तिथे बसून मी कामे पूर्ण करतो. विशेष म्हणजे केंद्राच्या विविध योजना देखील असतात त्या आपल्याला या मतदारसंघात आणून येथील विकासमार्गांना गती द्यायची आहे.
11 तारखेला सासवडला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थितीत सभा होणार आहे. जेजुरीच्या नाझरे धरणात सुद्धा पाणी आणणार आहे. हे माझ्या अनेक दिवसांपासून डोक्यात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा व्हायची. आता का फिरावं लागतंय? विकासाचा ओघ चालू ठेवायचा असेल तर आपला खासदार निवडून द्या. भावनिक होऊ नका, कुठलीही गोष्ट करायची ती चांगली करायची हा माझा स्वभाव आहे, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सर्वांना मदत करतात. आपल्याला देखील गडकरी यांनी मदत केली. त्यांचे खूप खूप धन्यवाद…नमो रोजगार मेळाव्यासंदर्भात काहींनी टीका केली. फक्त 10 हजार नोकऱ्या दिल्या गेल्या म्हणून. परंतु आपण 1 हजार तरी नोकऱ्या दिल्या का?, असा अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना सवाल विचारला.
लोकं म्हणतील आमदारकी असताना खासदारकी कशाला? बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी खासदार हवा आहे. उमेदवारीचा अर्ज भरला आता एवढ केलंय. निवडून आल्यावर किती कामे करतो बघत राहाल. काही काही लोकांना फोन येत आहेत. मला फोन करण्याइतपत वेळ नाही. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभर फिरायचं आहे. आचारसंहिता असताना देखील निवेदनाचा गठ्ठा आलाय. लोकांना काम करतो म्हणून निवेदन देतात, असं अजित पवार म्हणाले.