पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन अखेरीस १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत हे ऐकल्यावर मनात येते की, ऑनलाईन पद्धतीनेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्घाटन करायचे होते तर ते आधीच का केले नाही? प्रवाशांची या नव्या टर्मिनलमुळे फार मोठी सोय होणार होती हे माहीत असूनही विमान प्रवास करणाऱ्या पुणेकरांची कुचंबणा करीत या नव्या टर्मिनलचे उद्घाटन इतके दिवस होऊ दिले नाही. या भाजपाच्या कृतीमुळे पुणेकरांमध्ये संताप उसळणे स्वाभाविक आहे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
मोहन जोशी पुढे म्हणाले की, पुणे शहर कॉंग्रेस पक्ष आणि ‘वेक अप पुणेकर’ यांच्यामार्फत गेले अनेक महिने रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो आणि पुणे विमानतळ नव्या टर्मिनलचे लोकार्पण लगेच व्हावे यासाठी आम्ही आवाज उठवला, आंदोलने केली, घंटानाद केले. त्यामुळेच मेट्रो मार्गाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने नुकतेच केले गेले आणि आता नव्या टर्मिनलचे लोकार्पणदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत. जनआंदोलनाचे हे सारे श्रेय आहे, असे ते म्हणाले.
वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेळ नाही हे लक्षात घेता मेट्रोसाठी रेल्वेमंत्री आणि टर्मिनलसाठी हवाई वाहतूकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करता आले असते. असे सांगून मोहन जोशी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांच्या पक्षात दराराच एवढा मोठा आहे की, पुणे भाजपला रेल्वेमंत्री अथवा हवाई वाहतूकमंत्री हा पर्याय सुचवण्याचे धारिष्ट्य झाले नाही, हे देखील यातून दिसून येते.