वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण देशात नवा हुकूमशाह निर्माण केला आहे. देशाची व्यवस्था एवढी बिघडवलेय की, कोर्टाला म्हणावे लागले की मीच आता निवडणूक अधिकारी. चंदिगडमध्ये भाजपने काय केले,भय निर्माण केले. कोर्टातदेखील अधिकारी खरे बोलत नाही. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मते मोजली तेव्हा जिंकलेला माणूस हरलेला होता आणि हरलेला माणूस जिंकला होता, हे स्पष्ट झाले.
जागतिक बँकेच्या माहितीनुसार, मोदी सत्तेत येण्यापूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 24 रुपयांचे कर्ज होते. गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत दरडोई कर्जाचा आकडा 84 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, एखाद्याला 10 हजार पगार मिळत असेल आणि बँकेला 10 हजार हप्ता द्यावा लागत असेल तर आपल्याकडे काही शिल्लक राहील का? अशावेळी आपण घरदार विकायला काढतो ना? 2026 साली देश कर्जात बुडालेला असेल. आपल्याला घरातील भांडी विकावी लागतील, अशी परिस्थिती ओढावेल, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
भाजपमध्ये गेला की चोर बनतो साधू
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आज देशात तपासयंत्रणांकडून धाडी टाकल्या जात आहेत. गेल्या 10 वर्षात सरकारने किती धाडी घातल्यात याचे आकडे द्यावेत. धाडी घालणे तुमचा अधिकार आहे. पण त्यापैकी कितीजणांना कोर्टाने शिक्षा सुनावली? उलट असे दिसत आहे की, गंगेत स्नान केल्यासारखा चोर भाजपमध्ये साफ होऊन जातो.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातच्या माणसांना एक वागणूक आणि इतरांना वेगळी वागणूक दिली जाते. तुम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणले तर पुढील पाच वर्षांमध्ये सर्वच कारखाने गुजरातला गेले म्हणून समजा. मला माहिती आहे की, तुम्हाला या गोष्टी पचवणे कठीण आहे. पण इथले कारखाने पळवलेत की नाही? मग उद्या पुन्हा ते पळवले जातील. मतांच्या रुपाने तुम्ही मोदींना त्या गोष्टीचे लायसन्स द्याल. त्यामुळे भाजपला मतदान करु नका.