मराठा समाजाविषयी फडणवीसांच्या मनात खुन्नस आहे. पंतप्रधान, गृहमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावे. तुम्हाला पद जनतेच्या रक्षणासाठी दिले आहे. संचारबंदी करून गुंडगिरी करण्यासाठी दिले नाही. देवेंद्र फडणवीस मराठ्यांची जिरवायला लागलेत. मराठा नेत्यांना हाताशी धरले आहे. मराठा समाजाने शांतपणे हे बघावे, आंतरवाली सराटीत संचारबंदी का लावली? एवढी दडपशाही का केली जात आहे, गृहमंत्री असा नसावा, जनतेवर दडपशाही करून स्वत:ची गुंडगिरी लावावी, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मी बोलल्यावर राग कसा येतो? मराठा समाजाचे आमदार, मंत्री खूप मोठी चूक करत आहे. आंदोलनामुळेच कुणबी दाखले मिळाले, 10 टक्के आरक्षणही यामुळेच मिळाले. मराठा नेत्यांनी भानावर या. मी घाबरत नाही. मराठे गप्प बसणार नाही. कालपासून बैठका सुरू झाल्या आहेत. ताकदीने मराठा समाज बैठका घेत आहे,फक्त मला साथ द्या, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
10 टक्के आरक्षण दिले आहे ते 50 टक्क्यांच्या आत द्या. मराठा समाज मागास आहे हे सिद्ध झाले आहे. मग ओबीसीतून आरक्षण का देत नाही. मराठा समाजाने एकजूट राहावे. माझ्याविरोधात टोळी उभी केली आहे, असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर उलट्या बुद्धीची लोक मला अटक करा म्हणत आहे, असा टोला लगावतानाच जातीपेक्षा तुम्हाला पक्ष मोठा झाला का? अशी संतप्त भावना जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मला जेलला टाकले तरी मी मागे हटत नाही. मी नेत्याला बोललो म्हणून काहींना झोंबले आहे. काही आमदार असे तुटून पडलेत जसे पूर्वीचा राग आहे. तुमची माया गोरगरिब मराठ्यांसोबत नाही, मी गोरगरिब मराठ्यांचा लढा लढतोय म्हणून माझी चौकशी करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तर राज्यात जाणुनबुजून जे षडयंत्र सुरू आहे त्याकडे मराठा समाज शांत बघून पाहत आहे. सत्तेचा गैरवापर करून एसआयटी लावली जात आहे. हजारो कोट्यवधी घोटाळे करणारे आसपास फिरायला लागलेत. त्यांच्यावर चौकशी लावत नाही.