पुणे : शहरात अंमली पदार्थांचे वाढणारे सेवन, त्याच्या आहारी गेलेली तरूणाई, व्हायरल झालेला व्हिडिओ आणि या सगळ्यामुळे खडबडून जागी झालेली यंत्रणा सध्या पाहायला मिळत आहे. याच विषयाचा गांभीर्याने विचार करून अशा घटनांवर उघडपणे चर्चा व्हावी आणि अंमली पदार्थांच्या विळख्यापासून शहर मुक्त व्हावे यासाठी आपण सामान्य नागरिक म्हणून काय करू शकतो, या संदर्भात माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी ‘पर्वती संवाद’ या महाचर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. या कार्यक्रमास वक्ते म्हणून सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, ड्रग्स संबंधित काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विशाखा वेलणकर उपस्थित होते.
पुण्यातील एका टेकडीवर नुकतीच दुर्दैवी घटना घडली. महाविद्यालयीन मुली शुद्ध हरपलेल्या आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्या,
सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले की, पुण्यासारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडत असेल तर अशा गोष्टी होऊच नयेत म्हणून कार्यरत असणारी संबंधित यंत्रणा काय करत होती, या गोष्टींसाठी सरकारी यंत्रणाच जबाबदार आहे असं वाटतं. त्यात सोशल मीडियाचा होत असलेला दुरुपयोग आहेच. पॉझिटिव्ह व्यसनं हेच निगेटिव्ह व्यसनांना उत्तर असू शकत, त्यामुळे चांगली व्यसनं लावून घेणं गरजेचं. शिवाय अशा गोष्टी रोखण्यासाठी ‘एव्हरीथिंग इज मॅनेजेबल’ हा मंत्र बदलणे गरजेचे आहे.
सामाजिक कार्यकर्त्या विशाखा वेलणकर म्हणाल्या, ‘मला सगळं विसरायचंय याचं टेन्शन घेऊन अनेकजण ड्रग्स आणि व्यसनाधीतेकडे वळतात. पण ते हेच विसरतात की ड्रग्स आणि व्यसनाधीतेमुळे हे टेन्शन काही कालावधीसाठीच नाहीस होतं आणि पुन्हा नंतर सामोरं येतंच. स्वनियमन आणि स्वसंयम हाच ड्रग्स आणि व्यसनाधीतेकडे न वळण्याचा इलाज आहे. व्यसनी व्यक्तीला स्वतःहून जोपर्यंत व्यसन सोडावंसं वाटत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही, आणि यासाठी मनाचा ठामपणा गरजेचा आहे.
‘पर्वती संवाद’ या कार्यक्रमाला स्थानिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारचे सामाजिक विषयांवरील कार्यक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी नोंदविले.