पुणे -तब्बल साडेचार वर्षे उलटली, त्या काळ्या दिवसाची आठवण अजूनही अनेकांच्या मनात घर करून आहे २५ सप्टेंबर २०१९….पुण्यातील आंबिल ओढ्याला पूर आला, २० पेक्षा अधिक जणांचा बळी या पुराने घेतला, यावेळी कोण फिरकले कोण फिरकले नाही हे सोडाच पण यु टर्न कसा घेतला या ओढ्याने तो सरळ केला कि नाही ? लोकांना जाहीर केलेली आर्थिक मदत केली कि नाही ?असे अनेक प्रश्न वाऱ्यावर सुटले. पण आता लोकसभा निवडणूक आल्यावर मात्र राज्य सरकारने आंबील ओढ्याच्या कामासाठी २०० कोटी रुपयांचा निधी द्यावा असा महापालिकेचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
२०१९ च्या पुरा नंतर महापालिकेकडून मदत न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये याबद्दल नाराजी होती. कात्रजपासून ते नवी पेठ या दरम्यान आंबिल ओढ्याच्या लगतच्या प्रभागातून भाजपचे २३ नगरसेवक निवडून आलेले होते. तसेच पर्वती विधानसभा व पुणे लोकसभा मतदारसंघात या भागाचा समावेश आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोडांवर राज्य सरकारने २०० कोटीचा निधी मंजूर तर केला आहे.शहरातील पूरस्थिती नियंत्रणासाठी नाले आणि सीमा भिंती उभारणे, या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी राज्य सरकारने तब्बल २०० कोटी रुपयांचा विशेष निधी पुणे महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात विशेष निधी मिळावा, यासाठी आपण महापौर असल्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर त्यांनी निर्णय घेत हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय संदर्भातील शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.हे आपल्या पाठपुराव्याचे यश आहे असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
पुणे शहरातील नाल्यांची कामे आणि सीमा भिंती बांधणे यासाठी महापालिकेचा निधी तांत्रिक अडचणींमुळे खर्च करता येत नव्हता. त्यामुळे सीमा भिंतींची कामे रखडली होती. नाला परिसरातील नागरिकांमध्ये पाऊस काळात चिंतेचे वातावरण होते. म्हणून या कामासाठी राज्य सरकारच्या विशेष निधीची आवश्यकता होती.मोहोळ म्हणाले,’ फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन ‘महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या अंतर्गत २०० कोटी रुपये मंजूर करुन घेतले आहेत. उपलब्ध झालेल्या निधीमुळे शहरातील नाल्यांच्या कडेने संरक्षण/सीमा भिंती बांधल्या जाणार असून विशेषतः आंबील ओढा परिसराला याचा मोठा फायदा होणार आहे. या सीमा भिंतींमुळे पूरपरिस्थितीत पाणी प्रवाही राहण्यास मदत होणार आहे.
मोहोळ म्हणाले, ‘कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने २०१९ साली आंबिल ओढा परिसरात दुदैवी घटना घडली, त्यात वित्त आणि मनुष्यहानी झाली. असा प्रकार टाळण्यासाठी सीमा भिंतींची कामे महत्त्वाची ठरणार होती. त्यासाठी आपल्या पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला, याचे नक्कीच समाधान आहे.देवेंद्रजींचे पुणे शहराकडे विशेष लक्ष असल्याचे या निधीच्या मंजुरीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे’‘हा निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद’, असेही मोहोळ म्हणाले.
आंबील ओढा सीमाभिंतीचा ठराव मान्यतेनंतरही ४५ दिवस स्थायी समितीमध्ये पडून..’गौडबंगाल ‘ काय ?
कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे भूसंपादन करण्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपये महापालिकेला देण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे. हा निर्णय होऊन तीन आठवडे उलटून गेले तरी हा निधी अद्याप महापालिकेला मिळाले नाही. त्यामुळे भूसंपादनाचे काम ठप्प आहे.