मुंबई-जरांगे यांच्या आंदोलना विषयी बोलताना हे कोणाचे पाप, हे सर्वांना माहिती आहे. कोणाचे ओएसडी आणि पीए त्यांना भेटण्यासाठी जात होते, हे देखील पूर्ण महाराष्ट्राला माहिती असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जारेदार हल्हाबोल केला. राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी सडकून टीका केली.
जरांगे यांना कोणी तयार केले. त्यांना तयार करणारे कोण? त्यांची इच्छाशक्ती वाढवणारे कोण? सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. कोणाचे ओएसडी त्यांना भेटण्यासाठी जात होते? कोणाचे पीए जात होते? कोण तडजोडी करत होते? कोण त्यातून मार्ग काढत होते? त्यातून जरांगे यांची हिम्मत कोण वाढवत होते? हे सर्वांना माहिती आहे. हे कोणाचे पाप आहे, हे सर्वांना माहिती आहे. आमचे पीए थोडीच त्यांना भेटण्यासाठी जात होते. जे पेराल तेच उगवेल अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार यांच्यावर टीका केली.
राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून स्वतंत्र दहा टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी समाजातूनच आरक्षण हवे आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन कायम ठेवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांच्या वतीने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या अधिवेशनात केला जाणार आहे.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा तसेच त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने अंतरीम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकार आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.