पुणे, दि. १९ फेब्रुवारी २०२४: छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्य स्थापनेची लढाई ही धर्म, सत्ताव संपत्तीसाठी नव्हती तर सर्वसामान्य माणसांच्या स्वाभिमानासाठी, माणूसकीच्या तत्त्वांसाठी होती. शिवरायांच्या स्वराज्याने समतेचा नवा आदर्श निर्माण केला. नैतिकता व चारित्र्याचे अधिष्ठान देत शिवरायांनी जातीधर्माऐवजी माणुसकीच्या मूल्यांवर स्वराज्याची स्थापना केली असे प्रतिपादन कवी व लेखक श्री. सतिश हानेगावे यांनी सोमवारी (दि. १९) केले.
महावितरण व महापारेषणच्या वतीने रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य वक्ते म्हणून श्री. सतिश हानेगावे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (महावितरण) व अनिल कोलप (महापारेषण) आणि महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र गायकवाड (महापारेषण) यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात सर्व पाहुण्यांनी मनोगतामधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध कार्यासंबंधी माहीत दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दादासाहेब पाडोळे तर सूत्रसंचालन श्री. बाबा शिंदे यांनी केले. श्री. सचिन राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण, महापारेषणमधील अभियंते, अधिकारी व सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

