कोल्हापूर-शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री असताना व्यासपिठावरून खाली उतरवले, त्यांचे घर जाळण्यासाठी माणसं पाठवले तर रामदास कदम यांचा देखील कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी कटकारस्थान रचले असा व्यक्ती नेता कसा असू शकतो, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ते कोल्हापूरात शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, अहो काही लोकांना आयत्या पीठावर देखील नीट रेगोट्या मारता आल्या नाहीत, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना भर व्यासपिठावरून खाली उतरणवण्यात कोणाचे कारस्थान आहे. मनोहर जोशी यांचे घर जाळण्यासाठी माणसं पाठवणामागे कोणी कट रचला होता. दुसरी बाब म्हणजे, रामदास भाई कदम यांना देखील मी सांगितले होते की, तुम्ही शिवसेनेच्या कार्यक्रमासाठी षनमुखानंद सभागृहात येऊ नका, कारण तुमचा देखील मनोहर पंत करण्याचा प्लॅन करण्यात आलेला आहे. हे सर्व गज्याभाऊ यांना देखील माहित आहे. गजानन कीर्तिकर यांना देखील अनेकदा माघारी पाठवले गेले. सुडाचे राजकारण केले जात होते, असा कोणी नेता असतो का? असा सवाल शिंदे यांनी करत ठाकरेंवर निशाणा साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, एखादा कार्यकर्ता बोलायला लागला, चांगले भाषण करायला लागला तर त्याचे भाषण कट केले जात होते. गुलाबराव पाटील, रामदासभाई असे अनेक नावं आहेत. चांगले नेतृत्व व वक्तृत्व करत असेल होते. पण त्यांना संपवण्याचे काम सुरू झाले होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, दोन चार टकल्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा होत नाही. कुठली निवडणूक जिंकलो तर मला ठाकरे म्हणाले की, तुमच्यासाखरे तीन चार एकनाथ शिंदे पाहिजे. पण त्यांना प्रामाणिकपणे सांगितले एकना शिंदे नको तर ताकदीचे ताकदीचे कार्यकर्ते महाराष्ट्रात तयार केले पाहिजे, तेव्हाच पक्ष मोठा होईल.
ते म्हणाले की, शरद पवार म्हणाले तुम्ही मुख्यमंत्री व्हा, हे मला ते सांगत होते तेव्हा रडवेला चेहरा होता. तेव्हा जाणवले यांना मोह झाला आहे. मी कधीच पदाला हापापलो नव्हतो, त्यांनी मला आधीच सांगितले असते तर मी तसा माहोल तयार केला असता. ते दिसतात तसे इनोसंट नाहीत, त्यामागे अनेक चेहरे आहेत, एक चेहरे पे कई चेहरे लोग लगाते है लोग. माझा आवाज असा बंद करु नका तसा तो बंद होणार नाही कारण माझ्या सोबत शिवसैनिक आहेत.
लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलं आहे. हे मी संसदीय शब्द बोलतोय, मी कधीही असंसंदीय शब्द बोलत नाही निलम ताई सांगतील. मविआसोबत दिल्लीला गेले होते मोदींना भेटायला तेव्हा एकटेच गेले. केबिनमध्ये मोदींना भेटायला गेले आणि बाहेर आल्यावर घाम फुटला होता. दोन ग्लास पाणी प्यायले होते हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, जय श्रीराम म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सुरुवात केली. लवकरच आपण सर्व अयोध्येला जायचं आहे. या महाअधिवेशनामुळे कोल्हापुरात भगवं वादळ आलं आहे. शिवसैनिकांचे शक्तीपीठ या अधिवेशनाच्या निमित्ताने अवतरलं आहे. अंबाबाईचे दर्शन घेवूनच बाळासाहेब सभेला सुरुवात करायचे आपणही तेच केले. बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेवुन जातोय म्हणून ही आज शिवसेना आहे. या अधिवेशनामुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. एकनाथ शिंदे डरपोक नाही, हा निधड्या छातीचा चेला असल्याचे म्हणाले.