मार्च महिन्यात आचारसंहिता लागेल–मी मुख्यमंत्रीपदासाठी हपापलेलाे नाही
पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी मेळाव्यात बोलताना अजित पवार भावनिक झाले. परिवारात एकटे पाडण्यात आल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलताना त्यांनी नाव न घेता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. बारामतीमध्ये मी आणि माझा परिवार सोडला तर सर्व जण माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न काही जण करतील. घरातील सर्व माझ्या विरोधात गेले. तरी हे तुम्ही सर्व माझ्याबरोबर आहात”, असे अजित पवार म्हणाले.
मी मुख्यमंत्रीपदासाठी हपापलेलाे नाही. कोणाचाही पक्ष चोरलेला नाही असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच काही लोकं थोडं भावनिक करण्याचं प्रयत्न करतील, पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही असेही ते म्हणाले. घरातील सगळे माझ्याविरोधात, फक्त तुम्हीच माझ्यासोबत आहात असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली.
यावेळी ते म्हणाले की, मित्रांनो मी तुम्हाला दाव्याने सांगेने की, तुमची साथ आहे, तुमचा पाठिंबा आहे, तुमची एकजूट आहे, तोपर्यंत माझं काम अशाच प्रकारे सुरूच राहिल. काम करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यापद्धतीने आपल्या सर्वांचं काम चाललेलं आहे. मी पुन्हा सांगतो की, काही लोकं थोडं भावनिक करण्याचं प्रयत्न करतील, पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक होऊन कामे होत नाहीत”, असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
तसेच पक्षाबाबत बोलताना ते म्हणाले, ”लाेकशाहीत बहुसंख्येला महत्व असते. राज्यातील मतदारांचे आशीर्वादाने आतापर्यंत पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो आहे. विराेधी पक्षात असताना केवळ भाषणे करता येतात विकासकामे करता येत नाही त्यात अडचण निर्माण हाेते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेसाठी सर्वांनी जीवाचे रान केले त्यामुळे पक्षाचे चिन्ह घडयाळ व नाव सर्वत्र पाेहचवले. आम्ही काेणाचा पक्ष चाेरलेला नाही”, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.
अवघ्या काही दिवसांत लोकसभेची निवडणूक जाहीर होईल. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन मार्च रोजी पाच जिल्ह्यांचा नमो रोजगार मेळावा होणार आहे. त्यासाठी आपल्या परिसरातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. आपल्या राष्ट्रवादीसोबत भाजप आणि शिवसेना आहे. आपली घड्याळ तेच आहे फक्त वेळ नवी आहे”, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांनाही कामाला लागण्याचे आदेश दिले.