मुंबई-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून आता त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी राज्यसभेवर जाण्याची कवाडे पूर्णतः बंद झाली आहेत. आता त्यांना लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा संसदेत पाठवावे लागणार आहे .
अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपमधील राज्यसभा निवडणुकीची समिकरणे बदलली आहेत. नारायण राणे व पियुष गोयल यांच्यात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वाने या दोघांना आगामी लोकसभा निवडणुकीत उतरवून संसदेवर घेण्याची रणनीती आखली आहे.यासंबंधीच्या प्राथमिक माहितीनुसार, नारायण राणे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाईल. ते रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात शड्डू ठोकतील. विनायक राऊत मागील 10 वर्षांपासून या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. या पट्ट्यात त्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे विनायक राऊत यांना शह देण्यासाठी नारायण राणेंसारख्या आक्रमक व राजकारणाचा प्रदिर्घ अनुभव असणाऱ्या नेत्याला लोकसभेच्या मैदानात उतरवले जाईल.
नारायण राणेंशिवाय पियुष गोयल व भागवत कराड या 2 राज्यसभा सदस्यांनाही यावेळी लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल. यापैकी पियुष गोयल यांना मुंबईतील एखाद्या सुरक्षित मतदार संघातून उमेदवारी दिली जाईल. पण कराड यांना छत्रपती संभाजीनगर की अन्य एखाद्या मतदार संघातून मैदानात उतरवले जाईल हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभा निवडणुकीत भाजप अशोक चव्हाण वगळता आणखी 3 जागांवर उमेदवार उभे करेल. यापैकी पुणे महापालिकेच्या संग्रामासाठी रणनीती आखेल आणि यशापर्यंत नेईल असा पुणे शहरातून देखील राज्यसभेवर कोणा एका नेत्याला पाठवावे या मागणीचा विचार पक्षनेतृत्वाला करावा लागणारआहे.संजय काकडे, प्रकाश जावडेकर अशी शहरातील नावे आहेत यांना आता संधी मिळणार कि लोकसभा लढवावी लागणार कि आणखी कुठली जबाबदारी द्यावी लागणार यात नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.या शिवाय काँग्रेसचे माजी नेते हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून कोणतीही मोठी जबाबदारी किंवा पद मिळाले नाही त्यांना किंवा कोथरूडमधील नाराज माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून त्यांची पुनर्वसन केले जाऊ शकते.
राज्यातील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार राज्यसभेच्या 6 पैकी 3 जागांवर भाजप, तर शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा प्रत्येकी 1 उमेदवार निवडून येईल. याशिवाय काँग्रेसचाही 1 उमेदवार निवडून येईल. पण आता अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसची जागाही भाजपच्या खिशात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी काँग्रेसच्या काही आमदारांकडून राज्यसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपने चौथ्या जागेवरही उमेदवार उतरवण्याचा जुगार खेळल्यास त्यांना विजय मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.