इंडिया आघाडीत फूट नाही; राऊतांचा दावा
मविआ नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यांशी बोलताना नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यासमोरच इंडिया आघाडी संपली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून काही मु्द्दे आहेत. पण इंडिया आघाडी फुटली नाही. काही रणनीतीनुसार निर्णय होत आहेत. त्यानुसार, पंजाब आणि बंगालमध्ये तसे निर्णय घेतले गेले आहेत. दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये जागा वाटप होणार असून पंजाबमध्ये स्वतंत्रपणे लढणार आहेत. ममता बॅनर्जी या देखील भाजपच्या पराभवासाठी कार्यरत असणार असल्याचे राऊत यांनी म्हटले.
मुंबई-इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीलाही एक प्रकारे आरसा दाखवला. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे नाना पटोले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय राऊत उपस्थित होते.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इंडिया आघाडीचे शेवटचे मजबूत पार्टनर अखिलेश यादव सुद्धा बाहेर पडलेत. ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्ष सुद्धा बाहेर पडला आहे. या आघाडीमध्ये आम्ही ताक सुद्धा फुंकून पिऊ, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. यानंतर बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत सर्व काही ठीक असल्याचे सांगत सावरासावर केली.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) व वंचित बहुजन आघाडी या घटकपक्षांची शुक्रवारी मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलात बैठक झाली. या बैठकीला वंचितच्या प्रकाश आंबेडकरांसह इतर तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपशी दोनहात करण्याची रणनीती निश्चित केली. तसेच काही झाले तरी मविआ फूटू न देण्याचा चंग बांधला. प्रकाश आंबेडकर काही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी ही बैठक अर्धवट सोडून बाहेर पडले. त्यांना सोडण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बाहेर आले होते.
महाविकास आघाडीची गत आम्ही इंडिया आघाडीसारखी होऊ देणार नाही. आमच्यात काही मुद्यांवर एकमत झाले नाही तरी आम्ही आपल्या वाटा वेगळ्या वाटा करायच्या नाही असा निर्धार केला आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मविआच्या येथील बैठकीनंतर बोलताना सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आंबडेकरांनी कोणत्याही स्थितीत मविआची गत इंडियासारखी होऊ न देण्याचा निर्धार व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीने दोन्ही काँग्रेस व शिवसेनेपुढे ठेवलेल्या मुद्यांवर या बैठकीत सखोल चर्चा झाली. त्यात इतरही काही मुद्यांची भर घालण्यात आली. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. ही चर्चा यापुढेही सुरू राहील, असे ते म्हणाले.महाविकास आघाडीची गत इंडिया आघाडीसारखी होणार नाही याची दक्षता घेण्याचा आम्ही संकल्प केला आहे. त्यानुसार सर्वांनी ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतला आहे. मविआतील घटकपक्ष पुढील टप्प्यात जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा करतील. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यात आम्ही किमान समान कार्यक्रमावर चर्चा करत आहोत. ही चर्चा आज अर्धवट राहिली. त्यावर पुढील बैठकीत चर्चा होईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मविआतील घटकपक्षांत काही मुद्यांवर एकमत झाले नाही तरी वेगळ्या वाटा करायच्या नाही असा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या आघाडीची गत इंडिया आघाडीसारखी होणार नाही हे स्पष्ट आहे. पुढील बैठक केव्हा होईल याचा निर्णय प्रस्तुत बैठक संपल्यानंतर सांगण्यात येईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपने मला यापूर्वीच ऑफर दिल्याचा पुनरुच्चारही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी त्यांच्या बाजूला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.
लोकसभा निवडणुका पुढील काही दिवसांत होणार असल्यामुळे सत्ताधारी एनडीए व विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाच्या मुद्यावर खल सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधक या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडी कमजोर झाल्याचे दिसत असले तरी आगामी निवडणुकीच्या रणांगणात संपूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभेच्या 48 पैकी 34 जागांचा तिढा जवळपास सुटला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उर्वरित 14 जागा मविआतून कोणते पक्ष लढणार, याबाबत अजूनही रस्सीखेच सुरू आहे.