पुणे मेट्रोच्या लाईन ४ आणि ४ एचे कोथरुडकरांसमोर सादरीकरण
पुढील चार वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा मेट्रोचा संकल्प
पुणे:२०१६ रोजी पुण्यात मेट्रो प्रकल्प आला, तेव्हा हे अनेकांना दिवास्वप्न वाटत होते. मात्र मेट्रोच्या वर्तमान स्थिती मुळे मेट्रो पुणेकरांच्या जीवनाचा भाग बनली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. हिंजवडी मेट्रो मार्गिका ही लवकर सुरु व्हावी; अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर व वारजे परिसराला जोडणाऱ्या मेट्रो ४ आणि ४ ए प्रकल्पाच्या प्रस्तावित आराखड्यास नुकतीच मंजुरी मिळाली असून, सदर प्रकल्पाची माहिती स्थानिक नागरिकांना व्हावी, यासाठीचे सादरीकरण पुणे मेट्रोच्या वतीने आज करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, नगरसेवक राजाभाऊ बराटे, पुनीत जोशी, नगरसेविका मंजुषा खर्डेकर, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, शिवरामपंत मेंगडे, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांनी पुणे मेट्रोचा विकास, सद्यस्थिती आणि प्रस्तावित मेट्रो ४ आणि ४ एचे विस्तृत सादरीकरण केले. पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी, तसेच कुटुंबासोबत योग्य वेळेची उपलब्धता वाढवणं ही मेट्रोच प्राथमिकता आहे. ‘लास्ट माईल कनेक्टिविटी’साठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये सुरु असलेल्या शटल बससेवा आणि प्रीपेड रिक्षाचेही हर्डिकर यांनी कौतुक केले.
तसेच, प्रस्तावित मेट्रो ४ आणि ४ ए प्रकल्प आगामी चार वर्षांत पूर्ण करण्याचा मेट्रोचा संकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच, प्रस्तावित मेट्रो ४ आणि ४ ए प्रकल्पाबाबत नागरिकांच्या शंकांचेही निरसन केले.
ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी या सर्व सादरीकरणाबाबत समाधान व्यक्त केले. २०१६ मध्ये पुण्यात मेट्रो प्रकल्प आला, तेव्हा हे अनेकांना दिवास्वप्न वाटत होते. मात्र मेट्रोच्या वर्तमान स्थिती मुळे मेट्रो पुणेकरांच्या जीवनाचा भाग बनली आहे. मेट्रोच्या यशस्वीततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भरीव आर्थिक पाठबळ दिल्याने आज पुण्याच्या मेट्रोचे टप्पे पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहेत.
ते पुढे म्हणाले की, मेट्रो ४ आणि ४ ए हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कोथरुडकरांचा वेळ, पैसा वाचण्यासोबतच वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, पुण्यातील आयटीयन्ससाठी हिंजवडी मेट्रो मार्गिका देखील लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

