पुणे- नाल्यांची सफाई नेहमीच माध्यमांतून गाजते पण नदी जीला पवित्र देखील मानले जाते अशा नदीच्या सफाईसाठी कोणी भल्या जोरदार दमदार पावसाचीच आणि धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होण्याचीच जणू वाट पाहत आहे कि काय ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी स्थिती नेहमी असते . याच पार्श्वभूमीवर आज क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी काही फोटो सह महापालिका आयुक्तांकडे गाऱ्हाणे गायले आहे. पहा वाचा त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे….
मा. नवलकिशोर राम,
आयुक्त, पुणे मनपा.
विषय –
1) पावसाळ्यापूर्वी नदीपात्राच्या सफाई बाबत.
2) बाबा भिडे पुलाचे काम अजून किती वर्ष चालणार ?
मा. महोदय,
शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून त्याची पावसाळ्यापूर्वी सफाई होणे आवश्यक आहे अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने करत आहे.
विशेषतः डेंगळे पूल ते म्हात्रे पूल पर्यंत चा नदीपात्राचा भाग हा अत्यंत अस्वच्छ असून सोबत बाबा भिडे पुलाशेजारील काही छायाचित्र जोडत आहे.सदर कचरा नं हलविल्यास अवकाळी पावसाने किंवा ऐन पावसाळ्यात हा कचरा पुनःश्च नदीतून वहात जातो व शेजारील गावातून वाहताना तेथे अडकतो. याचे एक उदाहरण म्हणजे कवडीपाट येथे ह्या अडकलेल्या कचऱ्यामुळे तेथे येणारे परदेशी स्थलांतरित पक्षी कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे.
तसेच येथे नदीपात्रात मेट्रो चे साहित्य पडलेले असून ते देखील पावसाळ्यापूर्वी हलविणे गरजेचे आहे.
बाबा भिडे पुलाचे काम अनेक वर्ष सुरूच असून अनेकदा हा पूल वाहतुकीस बंद करून देखील येथे काम अपूर्ण असल्याचे दिसून येते. तरी मेट्रो व्यवस्थापनाशी चर्चा करून ह्या पुलाचे काम कधी पूर्ण होईल व येथील बॅरिकेड कधी काढले जातील याची माहिती जाहीर करावी.
आपण ह्या बाबत तत्परतेने कारवाई कराल अशी खात्री वाटते.
आपला,
संदीप खर्डेकर.

