व्याख्याते अभय टिळक यांचे मत : पुणे प्रार्थना समाज चैत्रोत्सवात व्याख्यान
पुणे : प्रार्थना समाज आणि भगवद्गीता यांचा संबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. लोककल्याण आणि लोकशिक्षण या दोहोंची जडणघडण तत्कालीन समाजव्यवस्थेत व्हावी यासाठी संस्थात्मक बांधणी व्हावी, ही ठाम भूमिका न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांच्या हयातीत घेतली. भागवत धर्माला अभिप्रेत असणाऱ्या भक्तीतत्त्वाचे मूर्तिमंत दर्शन म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचे जीवन आहे. आपले जीवन नीतिमान आणि शुद्ध बनवायचे असेल, तर आपली विचारप्रक्रिया शुद्ध पाहिजे. नामचिंतन हे मन शुद्ध करण्याचे साधन आहे. ज्याचे मन शुद्ध झाले आहे, त्याने समाजाला उन्नत बनवण्यासाठी कार्यरत झाले पाहिजे, असे मत व्याख्याते अभय टिळक यांनी व्यक्त केले.
पुणे प्रार्थना समाजाच्या हरी मंदिर प्रवेशाला यंदा ११७ वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या चैत्रोत्सवात व्याख्याते आणि अर्थविश्लेषक अभय टिळक यांचे व्याख्यान झाले. यावेळी पुणे प्रार्थना समाजाचे सभासद उपस्थित होते.
अभय टिळक म्हणाले, धर्माचा हेतू काय, धर्माचे नेमके उद्दिष्ट काय? तर सुखप्राप्ती हा धर्माचा हेतू आहे. परंतु भागवत धर्म असे सांगतो की, सुखप्राप्तीवर लक्ष केंद्रित केल्यास धर्माचे रहस्य कोणालाही कळणार नाही. उत्तम नागरिक बनणे हा धर्माचा खरा हेतू आहे. विकास अधिक होणे आणि क्षमता वाढणे हाच नागरिकतेचा मुख्य उद्देश आहे. जीवन सुसंस्कृत आणि संतुलित करण्यासाठी नीती आणि नैतिकता या दोन घटकांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सत्यनिष्ठा, न्यायनिष्ठा आणि सर्वांच्या हिताचा विचार ही मूल्ये अंगीकारल्यास समाज अधिक सक्षम होईल.
ते पुढे म्हणाले, धर्म केवळ बाह्य शुद्धतेपुरता मर्यादित राहिला असून, त्यामागील नैतिक मूल्ये हरवली आहेत. पूर्वी धर्मात अशा बंधनांचा अतिरेक नव्हता, मात्र आज ते औपचारिकतेत रूपांतरित झाले आहेत.
ही स्थिती बदलण्यासाठी समाजाची पुनर्रचना, परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल, तसेच व्यक्ती आणि समाजाच्या एकत्रित विकासाची गरज आहे.

