RSS भाजपसारखे 10 पक्ष उभे करू शकतो:आम्हाला कुणीच हरवू शकत नाही या भ्रमात राहू नका,
नागपूर -भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कट्टर हिंदुत्व बाळगणाऱ्या 10 भाजप उभ्या करू शकतो, असा खणखणीत इशारा ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी सत्ताधारी भाजपला दिला आहे. आम्हाला कुणीच हरवू शकत नाही. आता आम्हीच आहोत, या अहंकारात भाजपने राहू नये, असेही ते यावेळी म्हणाले.
शरद पोंक्षे नागपूर येथे राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित 3 दिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना भारत एक हिंदू राष्ट्र या विषयावर बोलत होते. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात हा कार्यक्रम झाला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमुळे आज हिंदू धर्माला चांगले दिवस आले. मधल्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर देशाचे वाटोळे झाले असते. काँग्रेसच्या कोणत्याही आंदोलनाने देशाचे भले झाले नाही. त्यांच्या कोणत्याही आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. मुळात हा पक्षच ब्रिटिशांनी स्थापन केला आहे.
शरद पोंक्षे यांनी यावेळी मनुस्मृती जाळणाऱ्यांनी ती वाचली नसल्याचाही दावा केला. हिंदू धर्मातील प्रत्येक धर्मग्रंथ महान आहेत. हजारो वर्षांपूर्वी आमच्याकडे सर्व शोध लागले. मोठमोठ्या आजारांची माहिती आमच्या धर्मग्रंथांमध्ये नमूद आहे. पण मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने आमचा धर्म, संस्कृती व परंपरांचा अभ्यास करू न देता केवळ गुलाम केले. मनुस्मृतीमध्ये कुणालाही दुय्यम वागणूक दिली नाही. ती जाळणाऱ्यांनी वाचली नाही. वाचली असती तर ते जाळूच शकले नसते, असे ते म्हणाले.
भारत हिंदू राष्ट्र घोषित करा
स्वातंत्र्याला 79 वर्षे लोटले तरी हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो ही एक मोठी शोकांतिका आहे. हिंदू समाज संघटित होऊन स्वतःच्या हक्कांप्रती पूर्णपणे जागृत होत नाही, तोपर्यंत हिदूंचे प्रभावी एकत्रीकरण होणार नाही. भारत हिंदू राष्ट्र होता, आहे व राहील. पण आता प्रत्यक्ष अधिकृतरित्या भारत हिंदू राष्ट्र घोषित व्हावा, असेही पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले.
शरद पोंक्षे यांनी यावेळी संघात भाजपसारखे 10 पक्ष उभे करण्याची ताकद असल्याचेही ठणकावून सांगितले. आज भारतात हिंदूंचे सण, उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जात आहेत. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आज गर्वाने म्हणा आम्ही हिंदू आहोत असे म्हणण्याची ताकद मिळाली आहे. याचे संपूर्ण श्रेय मोदींसोबत संघाला जाते. 100 वर्षांत अनेक उपेक्षा सहन करूनही संघ आज ताठ उभा आहे. संघ ही भाजपची आहे आहे. पण भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर अशा 10 भाजप संघ उभा करू शकतो. पुन्हा 10-15 वर्षे वाट पाहावी लागली तरी चालेल. पण कट्टर हिंदूंच्या 10 भाजप उभ्या करण्याची ताकद राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे, असे ते म्हणाले.

