पुणे: मंगळवार पेठेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न लवकर सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाच्या मालकीची जागा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिष्ठेला साजेसं भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
रिपब्लिकन पक्षाचे नेते व पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी बाळासाहेब जानराव, राहुल डंबाळे, महिपाल वाघमारे, उमेश कांबळे, जयदेव रंधवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत राज्य सरकारकडून स्मारकाबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे स्मारक उभारणीच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. तसेच आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता शक्य तितक्या लवकर करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चर्चेनंतर शिष्टमंडळाने समाधान व्यक्त करत, गरज भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित अधिकाऱ्यांची पुन्हा भेट घेऊन पुढील पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले की, मंगळवार पेठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठीचा लढा कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहणार आहे. हा लढा पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन व्यापक सामाजिक चळवळ म्हणून पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकीय हेवेदावे आणि आरोप-प्रत्यारोप दुर्दैवी असून, स्मारक उभारणी हाच आमचा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

