मुंबई-युद्धाच्या झळा अवघ्या जगाला बसत आहे. महाराष्ट्रात तर गॅस तुटवड्याची परिस्थिती दिवसागणिक हाताबाहेर जात आहे. त्यातच राज्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारी एक गाडीच चोरीला गेल्याची भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या पटलावर या घटनेचा उलगडा केल्यानंतर ही घटना समोर आली. मंत्रालयातील कॅन्टिनही बंद पडल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारकडे स्थिती स्पष्ट करण्यासाठी निवेदन करण्याची मागणी केली. त्यामुळे सरकारकडून या प्रकरणी आज एखादे निवेदन येण्याची शक्यता आहे.
विजय वडेट्टीवार सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच म्हणाले, काल रात्री सभागृह एक ते दीड वाजेपर्यंत चालले. काल आमदारांना कॅन्टिन बंद होती. त्यांना तिथे त्यांना काहीही जेवणास मिळाले नाही. आज मंत्रालयात अशी स्थिती आहे की, कॅन्टिनसुद्धा बंद झाली. महाराष्ट्रातील हॉटेल्सही बंद झालेत. महिलांमध्ये या गॅस तुटवड्यामुळे अस्वस्थता आहे. सरकारने दरवाढ केली. पण मुंबई, नागपुरातील 30 टक्के हॉटेल्स बंद झालेत. पुढच्या 2 दिवसांत पुन्हा सगळे हॉटेल्स बंद होतील. हॉटेल्स बंद होऊ द्या. पण घरगुती गॅसच्या पुरवठ्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, या गॅस तुटवड्यामुळे उद्या घरची चूल कशी पेटवावी, घरी स्वयंपाक कसा करावा अशी चिंता निर्माण झाली आहे. सध्या ओटीपी दिल्यानंतर 15 दिवसांनंतर गॅस सिलिंडर मिळत आहे. या परिस्थितीत महाराष्ट्रावर होणार परिणाम यावर सरकारने वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. यातून पुढे काय परिणाम होणार आहे हे सर्वांना माहिती आहे. हे युद्ध वाढले तर त्याचे परिणाम उद्या दिसतील. पण सध्या परिस्थिती गंभीर आहे. कोल्हापूर व विदर्भातील काही शहरांसह राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. गॅसच मिळत नाही.
एचपी कंपनीची गाडीच चोरीला
वडेट्टीवार म्हणाले, काल एचपीसीच्या गॅस सिलिंडरची गाडीच चोरीला गेली. 18 लाख रुपये किंमतीची सिलिंडर होती. मुंबईतही पुरवठा बंद आहे. एवढी भयावह परिस्थिती असताना सरकारकडून निवेदन आले पाहिजे. महाराष्ट्राला जनतेला सांगितले पाहिजे की, आता काय परिस्थिती आहे? या परिस्थितीतून आपण कसा मार्ग काढणार आहोत? आता आपल्याकडे उपलब्ध किती आहे? तुटवडा कसा निर्माण होणार आहे? काही बचत करायची असेल तर कशी करावी? यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असे ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला स्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. गॅस, पेट्रोलियम हा केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय असला तरी राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये याची जबाबदारी महाराष्ट्र शासन घेत असते आणि घेईल. त्यामुळे दिलेल्या माहितीची नोंद घेऊन शासनाने उचित उपाययोजना करावी, असे ते म्हणाले. त्यावर वडेट्टीवार यांनी पुन्हा सरकारच्या निवेदनाची मागणी केली. पण अध्यक्षांनी प्रथम सरकारला उपाययोजना ठरवू द्या, त्यानंतर ते निवेदन करतील, असे स्पष्ट केले.

