पुणे-जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने गुरुवारी देहूनगरी दुमदुमली. भजनी दिंड्यांनी रात्रभर केलेला जागर, काकडा आरती, महापूजा, हरिपाठ अन् वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथ, हरिनामाचा गजर आणि भाविकांची अलोट गर्दी अशा भक्तिमय वातावरणात ३७८ वा बीज सोहळा झाला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आजच्या दिवशी सदेह वैकुंठगमन झाले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. देहूनगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झाले होते. पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकडा आरती झाली. पहाटे चार वाजता देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापूजा संस्थानाचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे आणि विश्वस्तांच्या हस्ते झाल्या.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठगमन स्थान मंदिरात पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्यांना थोपवण्यासाठी खास पोलिस पथक तैनात करण्यात आले होते. इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून स्थानिक जीवरक्षकांचे पथक तैनात करण्यात आले होते. सोहळ्यामुळे आळंदीमार्गे येणारी वाहतूक विठ्ठलवाडी येथे थांबवली होती.

