: गीता धर्म मंडळ आणि ग्रंथ पारायण दिंडी यांच्यावतीने ‘नवीन वर्ष नवीन पंचांग’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
पुणे : ज्योतिषशास्त्र हे कालसापेक्ष असले तरी त्याची मूलतत्त्वे स्थिर आहेत. ग्रह तेच आहेत, परंतु त्यांच्या योगांनुसार काळ बदलत जातो. त्यामुळे ज्योतिषशास्त्र बदलत नाही, तर त्याचे आकलन काळानुसार पाहावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करताना नक्षत्रे आणि ग्रह यांना अत्यंत महत्त्व आहे. कालाच्या कसोटीवर त्यांचे निरीक्षण करूनच योग्य निष्कर्ष काढले जातात, असे मत ज्येष्ठ पंचागकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केले.
गीता धर्म मंडळ आणि ग्रंथ पारायण दिंडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोहन दाते यांचे ‘नवीन वर्ष नवीन पंचांग’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन सदाशिव पेठेतील गीता धर्म मंडळात करण्यात आले होते. यावेळी गीता धर्म मंडळाचे मुकुंद दातार, ग्रंथ पारायण दिंडीचे वीरेंद्र कुंटे उपस्थित होते. पंचांग क्षेत्रातील योगदानाबद्दल दाते यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला. सण आणि उत्सव तसेच रुढी परंपरा याविषयावर सुध्दा मार्मिक विवेचन केले,
मोहन दाते म्हणाले, घड्याळानुसार रात्री १२ वाजल्यानंतर वार बदलतो. हा इंग्रजी पद्धतीनुसार ठरवलेला वार आहे. परंतु पंचांगानुसार एक वार हा एका सूर्योदयापासून पुढील सूर्योदयापर्यंत मानला जातो. संपूर्ण पृथ्वीवर वेळेत फरक असला तरी खगोलीय घटना मात्र एकसमान असतात.
ते पुढे म्हणाले, पूर्वी सर्व व्यवहार पंचांगानुसारच चालत होते. पुढे कॅलेंडर पद्धती प्रचलित झाली. ऋतूंशी सुसंगती ठेवण्यासाठी सौर वर्ष (३६५ दिवस) स्वीकारले गेले, तर पंचांगातील चांद्र वर्ष साधारणतः ३५४ दिवसांचे असते, असेही त्यांनी सांगितले.

