लाईट गेल्याशिवाय लाईटची किंमत कळत नाही असे म्हणतात. पण लाईट येऊनही ती कुणामुळे आली हे कुणी जाणून न घेतल्याने ‘तो’ कायम दुर्लक्षितच राहतो. कारण विजेचा धंदा हा तसा जोखमीचा. त्यामुळे कामातली चूक एखाद्याला जिवानीशी चुकवावी लागते. इथे जर-तर, चर्चा, हुशारी काही कामाची नसते. प्रत्येक कामात तितकीच जोखीम असते. इतके असूनही ‘लाईनमन’ च्या आयुष्यावर फारसा ‘प्रकाश’ टाकलेला नाही. मात्र केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने २०२३ मध्ये ४ मार्च हा ‘लाईनमन दिन’ म्हणून जाहीर केला. त्यानिमित्ताने हा लेख…
मुंबईतला काही भाग वगळला तर सबंध महाराष्ट्राला वीज रुपी ऊर्जा पुरविण्याचे काम महावितरण ही सरकारी कंपनी करत आहे. नैसर्गिक आपत्ती, सामाजिक विरोध पत्करुन या कंपनीला कायम कार्यरत रहावे लागते. ग्राहक म्हणून आपल्याला कंपनीकडून अखंडितपणे वीज हवी असते. अगदी २४ तासांत एका मिनिटाचा जर खंड पडला तरी वीज यंत्रणेला टिकेचा धनी व्हावे लागते. पण ती यंत्रणा तुम्ही-आम्ही समजून घेत नाहीत. गेलेली वीज कोणीतरी रात्री-अपरात्री बिघाड दुरुस्त केल्याशिवाय येत नाही. हा वायरचा उद्योग आहे. वायरलेसप्रमाणे याकडे पाहणे चुकीचे ठरेल. महावितरणचा विचार केला तर एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जवळपास ८० टक्के कर्मचारी हे विजेच्या कामात थेट सामावलेले आहेत. ग्राहकाच्या मीटरपर्यंत वीज पोहोचविण्याचे काम प्रमुखत: लाईनमनरुपी कर्मचारी करत असतो. पदोन्नती आदी कारणांमुळे वीज कर्मचारी कंपनीत वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असले तरी समाजासाठी तो फक्त लाईनमनच असतो.
६० च्या दशकात वीज प्रत्येकापर्यंत पोहाचलेली नव्हती. याउलट आज वीज नसलेलं घर शोधावं लागेल. विजेवरचं अवलंबित्व दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे विजेच्या जाळ्याचा विस्तार गाव-खेड्यापासून शहरातल्या फ्लॅटपर्यंत झालेला आहे. सद्य:स्थितीत महावितरणची ग्राहकसंख्या ३ कोटी १२ लाख असून, विजेचा वापर १ लाख ४५ हजार दशलक्ष युनीटच्यावर पोहोचला आहे. रक्तवाहिन्यांप्रमाणे पसरलेलं हे विजेचे जाळे ११ लाख किलोमीटरचं झालंय. ४३६७ उपकेंद्रातून राज्याला २५ ते ३० हजार मेगावॅट वीज पोहोचवण्याचं अखंड काम महावितरणचे हे लाईनमन अविरत करत आहेत. या अवाढव्य पसरलेल्या यंत्रणेची नियमित देखभाल, दुरुस्ती करण्याचे काम महावितरणचे वीज कर्मचारी करतात. या जोखमीच्या कामात अनेकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे तर शेकडो लाईनमन आजवर जायबंदी झालेत. आता या क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून ‘लाईनवुमन’ची भरती झाली आहे. महिला असुनही त्या पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने काम करत आहेत. या लाईनमन दिनाच्या निमित्ताने किमान यापुढे तरी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तुमच्या-आमच्यासाठी काम करणाऱ्या लाईनमनला, त्याच्या कामाला प्रतिष्ठा मिळेल, ही आशा आहे.
विकास पुरी
जनसंपर्क अधिकारी
महावितरण, पुणे परिमंडल

