पुणे-पुणे शहरातील बाणेर परिसरात हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपावरून एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत २७ वर्षीय गंगा तेजस बेंबळकर हिने राहत्या इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले. या प्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.
मृत तरुणीचे वडील शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती तेजस शिवा बेंबळकर, सासू उज्ज्वला शिवा बेंबळकर, सासरे शिवा माणिकराव बेंबळकर आणि नणंद रिया शिवा बेंबळकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी हे कर्नाटकातील कलबुर्गी येथील प्राध्यापक असून, त्यांनी मुलीच्या लग्नासाठी मोठा खर्च केल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादीनुसार, साखरपुड्यापासूनच वादाला सुरुवात झाली होती. स्थळ पाहणीच्या वेळी वरपक्षाने कोणतीही मागणी नसल्याचे सांगितले होते. मात्र, साखरपुड्यावेळी वधूपक्षाने दिलेल्या आहेरावरून पाहुण्यांसमोर अपमान करण्यात आला. आहेर कमी प्रतीचा असल्याची टीका करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
वधूपित्याने मुलीच्या भविष्यासाठी स्वतःचा प्लॉट विकून महागडे मंगल कार्यालय बुक केले होते. विवाहासाठी मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची व्यवस्था केली असतानाही, वरपक्षाने कार्यक्रमस्थळ पसंत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. पाहुण्यांसाठी सोयी नसल्याचा मुद्दा उपस्थित करत अपमानास्पद वक्तव्ये करण्यात आली. लग्नाच्या दिवशीही किरकोळ कारणावरून वर उशिरा मंडपात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
विवाहानंतर काही दिवसांनी गंगा धार्मिक विधीसाठी माहेरी आली असता, सासरकडून हुंड्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे तिने वडिलांना सांगितले. माहेरून २१ तोळे सोने आणण्याची मागणी होत असल्याचा आरोप तिने केला होता. कुटुंबीयांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवले, मात्र त्यानंतर तिचा छळ आणखी वाढल्याचे समोर आले.
मृत तरुणीने मैत्रिणीशी फोनवर बोलताना सांगितले होते की, तिचा पती तिची अपमानास्पद तुलना करत असे, तिच्या शारीरिक स्वरूपावर टीका करत असे आणि शिक्षणाची खिल्ली उडवत असे. पतीने वैवाहिक आयुष्यातही दुरावा ठेवल्याचा आरोप आहे. तसेच, सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडूनही “लग्नातून काहीच मिळाले नाही” अशा टोमण्यांसह तिला सतत हिणवले जात होते.
५ फेब्रुवारी रोजी नातेवाईकांच्या कार्यक्रमात वडिलांना भेटताना गंगाने पुन्हा आपल्यावरील त्रासाबाबत सांगितले होते. कुटुंबीय पुढील महिन्यात तिला भेटण्याचा विचार करत असतानाच, १९ फेब्रुवारी रोजी तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

