माजी गृहराज्यमंत्री यांच्या समक्ष त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की
पुणे :काल एका कार्यक्रमात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांनी दादागिरी करत हल्ला केला.त्यामध्ये कॅमेऱ्याचे नुकसान झाले,पत्रकारांचे मोबाईल काढून घेऊन त्यांना उचलून नेण्यात आले,तर एका कॅमेरामनला पोलिसांनी ताब्यात घेऊन थेट गाडीमध्ये डांबल्याचा धक्कादायक प्रकार घडला.पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत संबधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकारांच्या वतीने आता करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पोलीस बळाचा वापर करून आशानगर येथील माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभ उदघाटन सोहळा दडपण्याचा प्रयत्न केला, त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करीत आहे, असे पत्रक माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
मोहन जोशी यांनी असे म्हटले आहे कि,’ कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक ११ आशानगर येथे पाण्याची टाकी उभी करण्यात आली. माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभ असे नामकरण झाले. त्याच्या उदघाटनासाठी महाविकास आघाडीचे नेते जमले होते. त्यात माझ्यासह माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, गजानन थरकुडे, उदय महाले, अविनाश बागवे आदी उपस्थित होतो. सर्वजण शांततेत कार्यक्रमासाठी जमा होत होते. त्यावेळी पोलीसांनी कार्यक्रम स्थळापासून हुसकावून लावण्यासाठी नेत्यांना धक्काबुक्की केली, कार्यकर्ते, पत्रकार यांना लाठ्यांनी मारहाण केली. फरफटत नेत पोलीसांच्या गाडीत बसविले. साऱ्या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली आहे.टाकी उभारणीचे श्रेय घेण्यासाठी भाजपच्या स्थानिक आमदारांनी उदघाटन कार्यक्रम आयोजिला होता. परंतु रहिवाशांचा प्रतिसाद मिळेना झाल्यावर पोलिस बळाचा वापर करून महाविकास आघाडीचा कार्यक्रम दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.
शिवाजीनगर येथील आशा नगर येथे पुणे महापालिकेने बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनापूर्वी काँग्रेस पदाधिकारी आणि पत्रकारांवर पोलिसांनी दमदाटी करत हात उगारले
पुणे महापालिकेने सुमारे साडेनऊ कोटी रुपये खर्च करून अशानगर येथे बारा लाख लिटर पाण्याची टाकी बांधलेली आहे. या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले होते.
दरम्यान, या टाकीची जागा ताब्यात घेणे भूमिपूजन करणे यासाठी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक दत्ता बहिरट यांनी प्रयत्न केलेले होते. माझ्या प्रयत्नातून या टाकीचे पाण्यासाठी मोफत जागा मिळाली, निधी उपलब्ध करून दिला पण आज याची कदर न करता भाजप या कार्यक्रमाचे श्रेय लाटत आहे, असा आरोप केला होता. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने काँग्रेसला सन्मानाने कार्यक्रमाला बोलवावे अन्यथा आम्हीच या ठिकाणी उद्घाटन करू असा इशारा दिलेला होता.
शुक्रवारी आशानगर येथे पाण्याच्या टाकीचा उद्घाटनाचा समारंभ होण्यापूर्वी काँग्रेसचे मोहन जोशी, आमदार धंगेकर, बहिरट अविनाश बागवे यांच्यासह अन्य पदाधिकारी आशा नगर येथे उपस्थित झाले. पोलिसांनी त्यांना रोखले पण धंगेकरांनी आतमध्ये जाऊन नारळ फोडून टाकीचे उद्घाटन केले. यावेळी पोलिसांनी अतिरेकीपणा करत दादागिरी आणि दमदाटी सुरु केली.