मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आता मालेगाव येथील इस्लाम पार्टीचे प्रमुख आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला शिवाजी महाराज आदरणीय आहेत, पण त्याचसोबत टिपू सुलतान यांचे कार्यही विसरता येणार नाही. इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का? असा सवाल आसिफ शेख यांनी उपस्थित केला आहे.
आसिफ शेख म्हणाले, टिपू सुलतान फक्त वेगळ्या धर्माचे आहेत म्हणून भारतीय जनता पक्षाकडून त्यांना विरोध केला जात आहे. मग भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळला जातोय? इंग्रजांविरोधात देशासाठी लढताना बलिदान देणाऱ्या टिपू सुलतान यांचा जर फोटो लावला तर त्यामध्ये गैर काय आहे? असाही सवाल शेख यांनी केला आहे.
पुढे बोलताना आसिफ शेख म्हणाले, टिपू सुलतान देशद्रोही होते का? त्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. इंग्रजांविरुद्ध देशातून पहिला आवाज हा टिपू सुलतान यांनीच उठवला. त्यांच्या कार्याची दखल भारतीय संविधानाने घेतली आहे. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांना एवढे वाईट का वाटते आहे? त्यांना तिरस्काराचे राजकारण करायचे आहे, दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत.
शहरातील शांतता कायम राहावी यासाठी आम्ही तो फोटो मागे घेतला, परंतु भाजप त्यावर एवढा गोंधळ का करतेय? जो पाकिस्तान भारतावर हल्ला करतोय, भारतात दहशतवाद पसरवतोय त्यांच्याशी आपण क्रिकेट का खेळतोय? यांना फक्त कोट्यवधी रुपये कमवायचे आहेत म्हणून हे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतात. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे बंद करावे, अशी मागणी आसिफ शेख यांनी केली.
पुढे बोलताना आसिफ शेख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आदर्श आहेत. पण 2014 नंतर देशात जातीयवादी आणि धार्मिक राजकारण सुरू झाले. त्या माध्यमातून विशिष्ठ एका धर्माला निशाणा केला जात आहे. भाजपला भारतीय संविधान बदलायचा आहे, पण ते तसे करू शकत नाहीत.

