पुणे-पुण्यात टिपू सुलतान यांच्या विटंबनेविरोधात स्वाती विलास गायकवाड (रा. ताडीवाला रोड, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे फौजदारी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पुणे येथील भाजपा व पतित पावन संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांच्या विरोधात जातीय तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे, दंगल घडविणे व महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांना भारतीय संविधानाने शपथ घालून दिली आहे की कायदा व सुव्यवस्था ते अबाधित ठेवतील; परंतु त्यांनी जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सरपणे दंगली घडवण्याच्या हेतूने प्रथम स्वातंत्र्यसैनिक मा. टिपू सुलतान यांना “नराधम” असे संबोधून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य स्थापन केलेल्या काळात टिपू सुलतान यांनी हजारो-लाखो हिंदूंची हत्या केल्याची खोटी दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
त्याचा आधार घेऊन पुणेभाजपा व पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन येथे बेकायदेशीररीत्या जमाव जमवून दंगल घडवून मनुष्यहानी व वित्तहानी केली व टिपू सुलतान यांच्या चित्राची विटंबना करून त्यांच्या चित्रावर काळे फासले तसेच सार्वजनिक रस्त्यावर आक्षेपार्ह वक्तव्ये केली.
जातीय मानसिकतेतून समाजकंटकांनी, जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने, दंगल घडविण्याच्या उद्देशाने आणि मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या गुन्हेगारी हेतूने सदरील महापुरुष टिपू सुलतान यांच्या बॅनरला काळे फासून विटंबना केली तसेच बॅनर फाडून छिन्नविछिन्न केला. टिपू सुलतान यांचा फोटो भारतीय संविधानात आहे असे असताना चुकीचा इतिहास सांगून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सरकारमार्फत केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर कृत्यामुळे माझ्या धार्मिक भावना, सामाजिक भावना आणि संवैधानिक निष्ठा गंभीरपणे दुखावल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हजरत टिपू सुलतान हे महान स्वातंत्र्यसैनिक, दलित स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षक आणि जातीय ‘स्तनकर’ संपवून समानतेचा लढा देणारे समाजसुधारक असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यांच्या विटंबनेमुळे जातीय व धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे SC/ST अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील (POA Act) कलमे लागू होतात, असे तक्रारीत नमूद आहे.
सदर प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, नागरी हक्क संरक्षण कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या वेळी अॅड. तोसिफ शेख, आय. टी. शेख, अॅड. क्रांती सहाणे, अॅड. सुरज जाधव, अमान पठाण, जाकीर नदाफ, अॅड. आदिल दातारांगे व इतर नागरिक उपस्थित होते.

