जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास आणि SDG २०३० राबविण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पीय अधिवेशनात बैठक घेण्याची केली सूचना
पुणे.दि.१२: आज पुणे विभागीय कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. याबैठकीत पुणे जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेत शाश्वत विकास ध्येये (SDG २०३०) साध्य करण्यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यात विशेष तरतुदी करण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे सादर केले आहे.
या निवेदनात ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा निर्देशक आराखडा तयार करून प्रगती मापन अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच रस्ते सुरक्षा, मेट्रो विस्तार, आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी, आरोग्य व्यवस्था आणि मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी विशेष निधी आणि उपाययोजनांची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.
याशिवाय पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास आणि SDG २०३० राबविण्याच्या दृष्टीने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व जिल्हयातील सर्व आमदार यांची मुंबईत विशेष बैठक घेण्यात यावी, अशी सूचना देखील डॉ. गोऱ्हे यांनी केली.
बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी दलितवस्ती सुधारणा निधी अखर्चित राहिल्याचे नमूद करून महसूल विभागाकडून सर्व निर्णयांची माहिती सादर करण्याची मागणी केली. विशेष गहन पुनरीक्षण (SIR) मोहीम व जातिनिहाय जनगणना कशा पद्धतीने होणार याची कार्यप्रणाली जाहीर करावी.
SDG साठी ३ टक्के निधी जिल्हा नियोजन मधून खर्च करण्यात येत असतो तो कोणत्या योजनांसाठी व कोणत्या घटकांसाठी खर्च केला आहे त्याचे सादरीकरण करण्याची डॉ.गोऱ्हे यांनी सूचना केली.
महिला सक्षमीकरणासाठी अधिक तरतुदी कराव्यात अशा इतर सूचनाही त्यांनी मांडल्या. केंद्र सरकारच्या ‘सखी’ (वन स्टॉप सेंटर) योजनेच्या केंद्रांना भेट देऊन पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठक सुरू होण्यापूर्वी सभागृहात विविध मान्यवरांनी दिवंगत नेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी अजितदादा कामकाजात अत्यंत दक्ष असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रेझेंटेशनवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. दादांच्या स्मारकासाठी जिल्हा नियोजनमध्ये तरतुद करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दादांच्या अचानक निधनाने तीव्र दुःख झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

