एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी सेन्नमलाई, अभिनेता पद्मश्री डॉ. मोहन आगाशे आणि सुप्रसिद्ध सरोजवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांना ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
पुणे, दि. ३ फेब्रुवारी: ” संगीतातून ईश्वर दर्शन घडते. मी केवळ संगीतातून लोकांशी संवाद साधतो. सुरांना समजून घेणे गरजेचे आहे तसेच गुरूंच्या चरणी समर्पण झाल्यास ज्ञान प्राप्तीचा मार्ग उघडला जातो. स्वर हेच ईश्वर आहे. असे मानून संगीताची सेवा केली.” अशी भावना पद्म विभूषण सरोजवादक उस्ताद अमजद अली खान यांनी व्यक्त केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे भारत ,पुणे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०२६ प्रदान समारंभ संपन्न झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
यावेळी जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितिचे निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड, हभप तुळशीराम दा कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.
यावेळी आंत्रप्रेन्यूअरशीपसाठी विशेष कार्य केल्याबद्दल प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’ तामिळनाडू येथील तरुण खासदार ज्योथिमणी सेन्नीमलाई, यांना ‘भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार’ चित्रपट अभिनेता पद्मश्री डॉ. मोहन आगाशे आणि भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पसरविल्याबद्दल पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांना ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी अडीच लाख रूपये, सन्मानपत्र व स्मृती चिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,” विकसित भारत २०४७ असा सकंल्प मांडत आहोत. इतके वर्ष प्रतिक्षा कशासाठी करायची. लवकरात लवकर विकास साधला पाहिजे. समाजासाठी कार्य करणार्या सर्व पुरस्कारार्थींचा सर्वांनी आदर्श घेऊन सामाजिक कार्य करावे. भारत अस्मिता पुरस्कार विजेते खर्या अर्थाने युवकांचे प्रतीक आहेत.”
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “आजच्या काळात मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धती आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सतत मोठ्यांकडून शिकत जावे. मन हे चंचल आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर चालून विनाशकारी दिशेने चाललेल्या जगाला थांबवू शकतो. जगातील सर्वात मोठ्या डोममधून भारतीय तत्वज्ञान, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन होते. अंतिम सत्य काय आहे, जीवन कसे जगावे आणि जगू नये याचे ज्ञान होणे गरजेचे आहे.”
डॉ. राहुल कराड म्हणाले, भारत अस्मिता पुरस्कार हा आपला राष्ट्र गौरव निर्माण करणारा आहे.
प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा म्हणाल्या,” शांती आणि मूल्य महत्वाचे आहे. जिज्ञासेच्या जोरावर केलेल्या कार्याचा हा सन्मान आहे. आता माझ्यावर आणखी मानवकल्याणाची जबाबदारी वाढली आहे.”
खासदार ज्योथिमणी सेन्नीमलाई म्हणाल्या,” मूल्य माणसाला जगण्याचं बळ देतात. मला भारत जोडो अभियानातून देशाची बहुविविधता कळली. त्यातून केलेल्या सामाजिक कामाचा हा सन्मान आहे.”
अभिनेता पद्मश्री मोहन आगाशे म्हणाले, “अध्यात्म विज्ञानाशिवाय आणि विज्ञान अध्यात्माशिवाय अपूर्ण आहे.”
या प्रसंगी दुघर्टनेत निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. गौतम बापट व आभार प्रदर्शन डॉ. आर.एम.चिटणीस यांनी केले.

