कविसंमेलनातून घडले समकालीन आशयसमृद्ध जाणिवांचे प्रातिनिधिक दर्शन

Date:

साहित्यदीप प्रतिष्ठानच्या काव्य महोत्सवात कविसंमेलनाला उत्स्फूर्त दाद

 पुणे : नागरी, ग्रामीण वास्तव, स्त्रीजीवनाच्या व्यथा – कथा मांडणारे, मिष्किल टिपण्णी करणारे, हलकाफुलका मूड जपत अंतर्मुख करणारे  असे आशयसमृद्ध जाणिवांचे प्रातिनिधिक दर्शन रविवारी रसिकांना कविसंमेलनाच्या माध्यमातून घडले. सर्वच कवींच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

निमित्त होते साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित दोन दिवसांच्या काव्य महोत्सवांतर्गत कविसंमेलनाचे. वि. का. राजवाडे सभागृहात महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर यांनी स्वागत केले. कविसंमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी भूषवले. डॉ. पं. संदीप अवचट यांनी सूत्रसंचालन केले. परभणीच्या अर्चना संबरकर आणि मधुरा उमरीकर या दोन कवयित्रींनी आपल्या आशयघन कवितांनी या कविसंमेलनाची उत्तम सुरवात केली. अर्चना यांच्या ‘कृष्णा’ या शीर्षकाच्या कवितेने मीच का राधा व्हायचं, मीच का मीरा व्हायचं…असे प्रश्न उपस्थित करत रसिकांना अंतर्मुख केले. मधुरा यांच्या ‘प्रकाशवाट’ कवितेने दाद मिळवलीच, पण

काल चार कविता नदीवर आल्या होत्या काळीज धुवायला, या कवितेने श्रोत्यांचे डोळे पाणावले.

कवडसा कधीचा मागे पडला आहे, मी अंधाराचा हात पकडला आहे

मी जीव लावण्या केवळ जन्मा आले, हा जन्म तुझ्यासाठीच निवडला आहे, ही ममता सिंधुताई सपकाळ यांची गजल रसिकांच्या मनाला भिडली.

शिरूरचे भरत दौंडकर यांनी सादर केलेली ‘मुलगा पुस्तक वाचत होता’, ही कविताही वास्तवाचा दाहक अनुभव सांगून गेली.

काहीच गुन्हा नसताना

पोलिसांनी बापाला पकडून नेले पालातून

तेव्हा मुलगा पुस्तक वाचत होता…इथून सुरू झालेली ही कविता, ‘मुलगा नेमकी कोणती पुस्तकं वाचत होता’, असा प्रश्न उपस्थित करत काळीज चिरून गेली.

मृणालिनी कानिटकर यांची ‘त्याला आवडते म्हणून’ ही कविता आधुनिक म्हणावणाऱ्या शहरी वास्तवाचे अस्वस्थ करणारे दर्शन घडवून गेली.

मला काय आवडतं, मी विचारलंच नाही कधी स्वतःला

कारण पिंजऱ्यामधल्या पाखराचा नसतो हक्क स्वतःवर

काळ अखंड वाहत असतो, काठ तसाच सनातन

माझे मूल्य तेच..तेवढेच. कोरलेले आजच्या शतकावर…या ओळी बोचणाऱ्या होत्या.

सुनीती लिमये यांची मोगरा ही रचना हळुवार आशयामुळे दरवळत राहिली.

श्रीपाद जोशी यांची ‘मनभर अंधाराला कणभर दिवा’ दाखवणारी कविता टाळ्या मिळवून गेली.

हनुमंत चांदगुडे यांचे खड्या आवाजातील सवालजबाब रसिक मनांना तमाशापटांच्या काळात घेऊन गेले आणि पाऊलवाट कवितेने गेय कवितेची चुणुक दिली.

माधव हुंडेकर यांनी अमृतांजन पूल कोसळताना पाहून मनावर उठलेल्या ओरखड्यांना कवितेचे रूप दिले. काळाच्या ओघात ढासळणाऱ्या पुलाचे मनोगत, शेवटच्या टप्प्यावर

मला फक्त इतकंच माहीत आहे

संपलं असेल कदाचित माझं आयुष्यमान

पण माझी गरज पुढेही पडणारच आहे

आणि म्हणूनच माझ्या पायामधून तेच बिंदू पुन्हा जोडणारा, नवा, देखणा, दणकट पूल पुन्हा उभारी घेणार आहे…या आशादायी वळणावर विसावले होते.

अनिल दीक्षित यांच्या ‘पुण्यात माझ्या’ या कवितेने पुणेकरांची विशेष दाद मिळवली.

जगात नाही अशी विविधता पुण्यात माझ्या

जगातले काहीपण मागा पुण्यात माझ्या

देवांना गंमत वाटावी वाचल्यावरी

इतकी टोपणनावे त्यांना पुण्यात माझ्या…अशी वैशिष्ट्ये जपत ही कविता रंगत गेली.

दीपाली ठाकूर यांनी जळातला मी कातळ काळा.. आणि झुंज रंगली पहाडासवे हातोडा आणिक छिन्नीची…या कवितांनी पकड घेतली. ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्या कवितावाचनाने या कवीसंमेलनाची सांगता झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

परदेश प्रवास स्वस्त :परदेशी वस्तू मागवणे स्वस्त

या अर्थसंकल्पातून काय स्वस्त झाले आणि काय महाग, ते...

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 चा सारांश

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2026 युवा शक्ती-संचालित हा अर्थसंकल्प  गरीब,...

 पुढील 25 वर्षांची रूपरेषा मांडणारा अर्थसंकल्प

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2026 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री...