एकीकडे तरुण बेरोजगार फिरत आहेत, उद्योगधंदे बंद पडत आहेत, गुंतवणूकदार देश सोडून जात आहेत आणि घराघरातली बचत संपत चालली आहे. बळीराजा संकटात आहे, मग कुणासाठी आहे हा अर्थसंकल्प?
पुणे- स्वराज्य पक्षाच्या आशिष भोसले यांनी हा अर्थसंकल्प नाही, तर जनतेची थट्टा आहे अशा शब्दात अर्थ संकल्पावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे कि,’केंद्र सरकारचा २०२६ चा अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांची धूळफेक आणि पोकळ घोषणांचा सुकाळ आहे. ज्यांच्या घरात चूल पेटते की नाही याची चिंता आहे, त्यांच्यासाठी हा अर्थसंकल्प म्हणजे एक विनोद आहे.
रोजगाराची हमी देणारी ही योजना या सरकारने उपासमारीची हमी देऊ केली आहे.
स्मार्ट सिटीच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी आता सिटी इकॉनॉमिक रिजन नावाचं नवीन गाजर दाखवलं जात आहे. एकीकडे तरुण बेरोजगार फिरत आहेत, उद्योगधंदे बंद पडत आहेत, गुंतवणूकदार देश सोडून जात आहेत आणि घराघरातली बचत संपत चालली आहे. बळीराजा संकटात आहे, मग कुणासाठी आहे हा अर्थसंकल्प?
पुण्यासाठीसाठी तर या बजेटमधून भोपळा हाती लागला असून कोणतीच मोठी गोष्ट आपल्यासाठी दिलेले दिसत नाही. शिवाय, ज्या घोषणा केल्या आहेत त्यापैकी एकाचीही अंमलबजावणी कशी होणार याची स्पष्ट दिशा दिसत नाही.
वाढत्या कर्जाच्या डोंगराकडे आणि येऊ घातलेल्या जागतिक संकटांकडे हे सरकार पूर्णपणे डोळेझाक करत आहे. हा अर्थसंकल्प वाचताना सरकारला सामान्य लोकांची पर्वा नाही हेच दिसून येते.

