पुणे- महा-पालिकेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे १५ नगरसेवक निवडून आले. आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या नवनियुक्त नगरसेवकांच्या बैठकीत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांची पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेते पदी एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अॅड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे शहर काँग्रेस उपाध्यक्ष अजित दरेकर, प्राची दुधाने व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मागील आठवड्यात काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री व पुण्याचे निरिक्षक सतेज उर्फ बंटी पाटील यांनी काँग्रेस भवन येथे सर्व नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांची स्वतंत्र भेट घेवून गटनेता पदासाठीचा कल घेतला होता. तेव्हाच कदम यांच्या नावास एकमताने समंती मिळाली होती.
गटनेते पदी निवड झाल्यानंतर अॅड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमवेत विभागीय आयुक्तांकडे जाऊन तसे पत्र सादर केले.

अॅड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम हे कोथरूडच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अग्रणी नाव आहे. चंदूशेठ यांना लोकसवेची प्रेरणा घरातून म्हणजेच माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक स्व.डॉ. पतंगराव कदम आणि पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष स्व. सुबराव कदम यांच्याकडून मिळाली. पुण्यातील कोथरुड भाग भाजपाचा बालेकिल्ला म्हणून सर्वश्रुत आहे. भाजपाच्या होम पीचवर चंदूशेठ गेली १५-२० वर्षांपासून नॉट आऊट बॅटिंग करत आहेत.२००७ साली चंदूशेठ यांनी पुण्यासारख्या महानगरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. प्रथम पाच वर्ष स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी कामाच्या जोरावर मोठा जनाधार मिळवला. आपल्या अथक परिश्रमाने लोकांशी जिव्हाळ्याच्या नाते जोडले.२०१२ साली त्यांनी पहिल्यांदा पुणे महापालिकेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना स्वतः तर मोठा विजय मिळवलाच शिवाय काँग्रेस पक्षाच्या सहकारी महिला उमेदवारला देखील निवडून आणले. हीच किमया त्यांनी २०१७ आणि आता २०२६ मध्ये करून दाखवली आहे.
लोकप्रतिनिधीत्वाच्या या प्रवासात त्यांनी प्रभागात शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा सक्षम केल्या. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, कोरोनात स्व. खर्चाने ५००० महिलांचे लसीकरण, महिला सशक्तीकरण योजना, बांधकाम कामगार योजना, घरेलू कामगार योजना, संजय गांधी निराधार योजना, पेन्शन योजना, आधारकार्ड वाटप, मोफत ई-श्रम योजना अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले.
नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी ते नेहमी उपलब्ध असतात. प्रत्येकाला आपुलकीने भेटतात, विचारपूस करतात, त्यांच्या अडचणी समजून घेतात आणि त्या सोडवण्यासाठी राबतात. त्यांच्या या मनापासूनच्या कामामुळे लोक त्यांना ‘आपलं चंदूशेठ’ म्हणून ओळखतात.
पुणे शहरात काँग्रेस पक्षाच्या विविध उपक्रमांकडे चंदूशेठ सक्रिय सहभाग घेत असतात. पक्षाची ध्येय धोरणे तळगळात पोहोचवण्यासाठी तळमळीने काम करतात. युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस मध्ये जाऊन तरुणांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शनपर प्रोत्साहन ते करत असतात. पक्षाच्या पातळीवर विविध मेळाव्याचे आयोजन ते करतात. लोकांच्या हक्कांसाठी मोर्चे, विविध आंदोलनात सहभागी होतात. म्हणून ते लोकभूमिख नेतृत्व ठरतात. विचारांची बैठक पक्की असली की कार्यकर्ते घडतात, हेच कार्यकर्ते पुढे प्रतिनिधित्व करतात अस ते नेहमी सांगतात. चंदूशेठ यांनी त्यांच्या आचरणातून काँग्रसचा सर्वसमावेशक विचार जपला आहे.
भाजपच्या प्रचंड ताकदीच्या विरोधातही चंदूशेठ यांनी कधी हार मानली नाही. कोथरुड सारख्या अभेद्य बालेकिल्ल्यात चंदूशेठ यांनी त्यांच्या अथक मेहनतीने, लोकांशी असलेल्या जवळीकने आणि काँग्रेसच्या मूल्यांवरचे अटळ विश्वासाने कोथरूडमध्ये काँग्रेसचा गड मजबूत केला. चंदूशेठ यांचे यश लोकांच्या मनातील विश्वासाची आणि प्रेमाची साक्ष आहेत.

