मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव झाल्यासंबंधी केलेल्या विधानाचा सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला आहे. काँग्रेस नेत्याचे विधान देशभकर्ती नव्हे तर देशद्रोह आहे. त्यांच्या विधानाच्या पाकिस्तानात हेडलाईन्स झाल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकने भारताचा पराभव केल्याचा धक्कादायक दावा केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पण या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 मे रोजी अर्ध्या तासातच आपली काही विमाने पाडण्यात आली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यासह देशात एकच खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगामच्या हल्ल्यात आपल्या लाडक्या बहिणींचे सिंदूर पुसण्याचे पाप केले. त्याचा संपूर्ण जगाने निषेध केला. त्यानंतर आपल्या लष्करी जवानांनी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्याचा अभिमान सर्वच भारतीयांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी लष्कराला ‘खून का बदला खून से’ घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर झालेल्या कारवाईत लष्कराने आपल्या लोकांवर कोणताही हल्ला होऊ दिला नाही. त्यांनी पाकिस्तानातील अतिरेकी अड्डे उद्धध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला एक जबरदस्त उत्तर दिले.
ते म्हणाले, लष्करी जवानांनी उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारचे विधान काँग्रेसकडून होणे ही अत्यंत चिंताजनक व दुर्दैवी बाब आहे. देशविघातक बाब आहे. हे देशप्रेम नव्हे तर पाकिस्तान प्रेम आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी केलेल्या विधानाच्या पाकिस्तानात हेडलाईन्स झाल्या. त्यामुळे पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्तानची जनता माफ करणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही लष्कराच्या पाकवरील कारवाईचा हिशोब विचारला होता. किती ड्रोन पडले, किती विमाने पडली, किती तासांत युद्ध थांबले? त्यांनी लष्कराच्या मागे उभे राहण्याची गरज होती.
काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई हल्ल्यानंतर भारतावर दबाव असल्याचे विधान केले होते. कुणाचा दबाव होता? ही देशभक्ती नव्हे तर देशद्रोह आहे. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले, 26/11 चा हल्ला झाला त्यावेळी अशा प्रकारचा सडेतोड उत्तर तत्कालीन काँग्रेसच्या दिल्लीतील सरकारने देणे अपेक्षित होते. पण दुर्दैवाने त्यांनी तसे केले नाही. त्यांनी त्यावेळीही मतांचे राजकारण केले. मी त्याचा जाहीर निषेध करतो, असे शिंदे म्हणाले.
या प्रकरणी लष्कराला खऱ्या अर्थाने सॅल्यूट केला पाहिजे. त्यांनी पहलगामच्या लाडक्या बहिणींचे कुंकू पुसणाऱ्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन करतो. त्यांनी पाकविरोधात रक्त व पाणी एकाचवेळी वाहणार नाही अशी कणखर भूमिका घेतली. याला देशभक्ती व राष्ट्रभक्ती म्हणतात. काँग्रेसच्या नेत्यांनी अशा प्रकारचे विधान पाहून देशाची जनता त्यांची कबर खोदल्याशिवाय राहणार नाही, असेही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

