पुणे-रखडलेल्या शिवणे खराडी रस्त्याच्या कामाची श्वेतपत्रिका काढा तसेच राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यान च्या अपूर्ण कामांबाबत , डीपी रस्त्यावरील दुभाजका संदर्भात महापालिकेच्या पथ विभागाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

या संदर्भात महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि,’
शिवणे ते खराडी ह्या रस्त्याच्या कामाला आता बारा / तेरा वर्षांचा कालावधी लोटला असून हा महत्वकांक्षी प्रकल्प केवळ रखडला असे नाही तर ह्या रस्त्याबाबत प्रशासकीय अनास्था व इतर कारणांमुळे सद्यस्थितीत हा रस्ता बासनात गुंडाळल्यासारखी परिस्थिती आहे. तरी आपण त्वरित ह्या रस्त्याच्या स्थिती बाबत श्वेतपत्रिका काढावी व हा रस्ता कधीतरी पूर्ण होईल किंवा कसे याची माहिती करदाते पुणेकरांसमोर उघड करावी अशी आग्रही मागणी करत आहे.
शिवणे ते म्हात्रे पूल ह्या दरम्यान देखील महालक्ष्मी लॉन्स जवळ हा रस्ता अडकला आहे.
राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यान च्या 2 किमी अंतरातील समस्यांबाबत माझ्या पुढाकाराने 2013 साली आयोजित केलेल्या बैठकीला आता 12 वर्षे पूर्ण झालीत.
मात्र ह्या प्रचंड वाहतूक असणाऱ्या रस्त्यावरील अनेक समस्या जैसे थे आहेत.
1) ह्या डी पी रस्त्यावर राजाराम पुलाकडून येणारी वाहतूकीची विठ्ठल मंदिर चौकात मोठी कोंडी अनुभवायला मिळते.त्यावर उपाययोजना करावी.
2) “हॉटेल आमची” ते नवसह्याद्री चौका पर्यंत ( पंडित फार्म समोर ) रस्ता दुभाजक नसल्याने या ठिकाणी वाहनांची बेफाम वाहतूक व रोजच अपघात होत असतात.
येथे रस्ता ओलांडणेसुद्धा अवघड झाले आहे.
3) ऐन संध्याकाळी गर्दीच्या वेळेत अनेक ठिकाणी बेकायदा फेरीवाले, पथारीवाले यांनी बस्तान बसविले आहे.
या परिसरातील नागरिक आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पहात असून आपण त्वरित याबाबत सूचना देऊन पथारीवाल्यांवर कारवाई करावी ही विनंती.
4) ह्या रस्त्यावर ज्ञानदा शाळा,शुभारंभ लॉन्स, घरकुल लॉन्स अश्या अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जागा ( दुभाजकातून ओपनिंग ) ठेवण्यात आली आहे. हे आवश्यक आहेच मात्र धोकादायक देखील आहे. सदर ओपनिंग हे अश्या ठिकाणी केलेत की येणारी वाहने दिसतं नाहीत ( Blind Turn वर ) आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यास हा धोका आपल्या लक्षात येईल.त्यामुळे याठिकाणी पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता येईल यासाठी पादचारी क्रॉसिंग उभाराव्यात अशी आग्रही मागणी करत आहे.यामुळे वेगाला ही नियंत्रण बसेल आणि नागरिकांची सुरक्षितता देखील राखली जाईल.आपण त्वरित कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्याल अशी अपेक्षा आहे.


