पुणे- येथील बहुचर्चित आणि दुमजली – तिमजली इमारतींच्या लोकमान्य नगर पुनर्विकासाचा प्रकल्प पूर्ण झाला तर १० मजली इमारती होतील आणि रहिवाश्यांच्या संखेत , वाहनांच्या संख्येत दुपटी तिपटीने वाढ होईल आणि रस्त्यांची रुंदी मात्र वाढणार नाही अशा अवस्थेत होऊ पाहणाऱ्या सर्वच पुनर्विकासाच्या प्रकल्पांचा सारासार विचार व्हावा असा वाहतूक कोंडीतून ,प्रदूषणातून शहर वाचवा म्हणणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील काही लोकांचा सूर असताना आता हा पुनर्विकास प्रकल्प होऊ द्यात त्याला आडकाठी आणू नका अशी भूमिका घेत रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र देऊन लोकमान्यनगर पुनर्विकासावरील स्थगिती उठवावी अशी मागणी गेल्या एक महिन्यापूर्वीच केली आहे .
धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’लोकमान्य नगर पुणे येथील म्हाडा वसाहत सन १९६१ ते ६२ च्या दरम्यान म्हणजे साधारणपणे ६० वर्षांपूर्वी पानशेत धरणाच्या पुरानंतर स्थापन करण्यात आली. या बसाहतीमध्ये सर्वसाधारण मध्यमवर्गीय नागरिक राहत असून सद्यस्थितीत सदर नागरिक हे अत्यंत दुरावस्था झालेल्या इमारतीमध्ये राहत आहेत. या ठिकाणी ५३ इमारती असून सर्व इमारतीमधील नागरिकांनी नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या आहेत. यातील काही गृहनिर्माण सहकारी संस्थांचा पुनविकास अंतिम टप्प्यात आला आहे.
येथील इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून मूलभूत सोयी सुविधा देखील येथील नागरिकांना मिळत नाहीत. येवोल इमारतींचा पुनर्विकास लवकरात लवकर झाल्यास नागरिकांची होणारी परवड थांबणार आहे. परंतु काही घटक एकात्मिक विकासाच्या नावाखाली या ठिकाणची जागा आणि पुनर्विकासात मिळणारा लाभ विचारात घेऊन येथील रहिवाशांनी सुरू केलेले पुनर्विकासाचे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटकांनी शासनाची दिशाभूल करून एकात्म विकासाचा कुठलाही आराखडा नसताना देखील पुनर्विकासाला खीळ घातली आहे. शासनाने स्वानिक रहिवाशांची भावना विचारात घेऊन पुनर्विकासाला दिलेले स्थगिती तातडीने उठवावी व स्थानिक रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मी आपणाकडे या पत्राद्वारे विनंती करीत आहे.


