अग्निशमन दलाची दिवसभर धावपळ
पुणे-लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात सलग 40हून अधिक ठिकाणी आग लागल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या सर्व वाहनांची अक्षरशः धावपळ सुरू होती. सकाळी 5 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या सुमारे 25 गाड्यांनी 40 हून अधिक ठिकाणी आगी विझवल्या. सकाळी 5.12 पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत अग्निशमन विभागाला सतत कॉल येत राहिले. हडपसर, वारजे, कोथरूड, कसबा पेठ, धानोरी, सिंहगड रोड, बाणेर, औंध, येरवडा, विश्रांतवाडी, मार्केट यार्ड, कोंढवा खुर्द अशा सर्व भागांमध्ये एकापाठोपाठ एक आग लागल्याच्या घटना समोर आल्या. काही ठिकाणी इमारतींच्या गॅलऱ्यांमध्ये, पार्किंगमध्ये, झाडांना, गवताला किंवा कचऱ्याला आग लागल्याच्या नोंदी आहेत, तर काही ठिकाणी दुकानं आणि घरांनाही आग लागल्याचं दिसून आलं. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 42 ठिकाणी आग लागल्याचे कॉल प्राप्त झाले होते. बहुतेक ठिकाणी आगीचे कारण आकाशकंदील, फटाके किंवा इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये जीवितहानी झालेली नाही, मात्र काही ठिकाणी किरकोळ जखमी झाल्याच्या घटना आहेत.मध्यवर्ती अग्निशमन केंद्र, नवले, वारजे, बाणेर, येरवडा, कोथरूड, धानोरी आणि गंगाधाम केंद्रातील अधिकारी आणि जवान दिवसभर रस्त्यावर होते. काही ठिकाणी आग नियंत्रणात आणण्यासाठी जवळपास दीड-दोन तास लागले. दिवाळीच्या दिवशीसुद्धा अग्निशमन कर्मचारी घरच्यांपासून दूर राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आजचा दिवस आम्हाला सर्वात धकाधकीचा गेला. अनेक कॉल एकाचवेळी आले, पण आमच्या पथकांनी तातडीने प्रतिसाद देऊन मोठे अनर्थ टाळले. नागरिकांनी आकाशकंदील, इलेक्ट्रिक माळा आणि फटाके वापरताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.

