‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’च्या ३०व्या वर्षपूर्तीनिमित्त शाहरुख खान आणि काजोल यांनी खास आठवणी शेयर केल्या
आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (डीडीएलजे ) ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडती आणि अमर प्रेमकहाणी मानली जाते. शाहरुख खान आणि काजोल यांच्या या ऐतिहासिक ब्लॉकबस्टरने गेल्या तीन दशकांपासून भारतासह जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. ‘राज आणि सिमरन’ ही जोडी आजही प्रेमाचं प्रतीक बनली आहे. चित्रपटाच्या ३०व्या वर्धापनदिनी या दोघांनी त्या जादुई प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
शाहरुख खान म्हणाला “विश्वास बसत नाही की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेला ३० वर्षं झाली आहेत. असं वाटतं जणू कालच रिलीज झाला होता… कारण ‘बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं’! पण खरं सांगायचं तर अजूनही हे अविश्वसनीय वाटतं. ‘राज’च्या भूमिकेसाठी जगभरातून मिळालेलं प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. जेव्हा लोक सिनेमागृहात येऊ लागले आणि हा चित्रपट पाहून प्रेमात पडले — तो क्षण आयुष्यभर स्मरणात राहील.”
तो पुढे म्हणाला ,“या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर जो परिणाम केला, तो अप्रतिम आहे. आजही अनेक जोडपी मला भेटतात आणि सांगतात की त्यांनी लग्न केलं किंवा पहिल्यांदा प्रेमात पडले डीडीएलजे पाहिल्यावर! मला वाटतं, या चित्रपटाने भारतीय आणि दक्षिण आशियाई संस्कृतीच्या पॉप कल्चरवर एक आनंददायी छाप सोडली आहे.”
शाहरुख पुढे म्हणाला ,“या चित्रपटाच्या यशाचे श्रेय संपूर्ण टीमला, विशेषतः आदित्यच्या दृष्टिकोनाला आणि यशजींच्या आशीर्वादाला जातं. आम्ही सगळ्यांनी ही फिल्म प्रेम आणि प्रामाणिकपणाने बनवली होती. आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत हे प्रेम असंच जिवंत राहो…”
काजोल, म्हणजेच सिमरन, म्हणाली ,“डीडीएलजे चे ३० वर्षं पूर्ण होणं म्हणजे एखादं स्वप्न सत्यात उतरलयं असं वाटतं. हा चित्रपट आता एक वारसा झाला आहे, एक अशी आठवण ज्यात संपूर्ण पिढी जगते. ही फिल्म तरुणाईच्या बिनधास्तपणातून आणि पहिल्या प्रेमाच्या प्रामाणिक भावनेतून तयार झाली होती. आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती की राज आणि सिमरनचा ट्रेन स्टेशनवरील तो सीन इतका अमर होईल. गाणी, संवाद, सरसोंची शेते — सगळं पॉप कल्चरचा भाग बनलं.”
काजोल पुढे म्हणाली “डीडीएलजे चा एक अंश प्रत्येक रोमँटिक चित्रपटात आजही दिसतो. माझ्यासाठी सिमरन अजूनही जिवंत आहे — ती लाखो भारतीय मुलींचं प्रतिनिधित्व करते, ज्या आपल्या आई-वडिलांचा आदर करतात पण मनातून स्वातंत्र्याची आसही बाळगतात. म्हणूनच ती आजही लोकांच्या मनात घर करते. ‘जा सिमरन, जा’ ही ओळ आजही फक्त एक डायलॉग नाही, तर ती धैर्य आणि प्रेमाचं प्रतीक बनली आहे.”
काजोल म्हणाली ,“जे प्रेक्षक १६ वर्षांचे असताना डीडीएलजे वर प्रेम करू लागले, ते आज आपल्या मुलांसोबत हा चित्रपट पाहतात. कदाचित हीच डीडीएलजे ची खरी जादू आहे — प्रत्येक पिढीला ती स्वतःकडे नव्याने पाहायला भाग पाडते. जेव्हा एखादा चित्रपट ३० वर्षं लोकांच्या हृदयात टिकतो, तेव्हा तो फक्त सिनेमा राहत नाही — तो त्यांच्या ओळखीचा भाग बनतो.”
शाहरुख आणि काजोलची जोडी भारतीय सिनेमातील सर्वात आयकॉनिक ऑनस्क्रीन जोडी ठरली. यावर काजोल म्हणाली,“डीडीएलजे ला मिळालेलं प्रेम माझ्यासाठी सदैव खास राहील. हा चित्रपट एक सांस्कृतिक टप्पा ठरला ज्याने लोकांना दाखवून दिलं की खरं प्रेम नेहमी जिंकतं. एखादा चित्रपट जेव्हा फेनोमेनन बनतो, तेव्हा ते केवळ कथा नसते — ती भावना असते.”
ती पुढे म्हणते “आदित्य चोप्राचा दृष्टिकोन आणि संवेदनशीलता हा या चित्रपटाचा खरा आत्मा होता. परंपरा आणि आधुनिकतेतला समतोल, आणि आपल्या मनाचा आवाज ऐकण्याचं धैर्य — ही थीम्स कधीच जुन्या होत नाहीत.”
शाहरुखसोबतच्या केमिस्ट्री बद्दल काजोल म्हणाली ,“शाहरुखसोबत काम करणं नेहमीच सहज होतं. आमच्यात एक अनोखं समजून घेणं आणि विश्वास आहे. स्क्रीनवर ते इतकं नैसर्गिक वाटतं की अभिनय आणि वास्तव यांच्यातील सीमाच पुसट होते. म्हणूनच प्रेक्षकांना तो जादूई अनुभव जाणवतो.”

