पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आज पुण्यात भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शेकडो युवकांनी हातात मशाली घेऊन “मतदान चोरी बंद करा”, “तरुणांना नोकरी द्या”, “लोकशाही वाचवा” अशा आक्रमक घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी मोरे यांच्या नेतृत्वात देत रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त करत म्हटले की –”सरकारने लोकशाहीची गळचेपी करून निवडणुकांमध्ये उघडपणे मतदान चोरी केली आहे. बेरोजगारीचा राक्षस प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी खेळत आहे. युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही गप्प बसणार नाही. ही मशाल आता तरुणांच्या हातून उठलेली ज्वाला आहे, जी भ्रष्ट सत्तेला राखेत मिळवेल.”
त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी आक्रमक भाषेत सरकारला इशारा देत म्हटले “युवकांच्या भविष्याशी गद्दारी करणाऱ्या या सरकारला आम्ही रस्त्यावर उतरून सणसणीत उत्तर देत आहोत. मतदान चोरी करून सत्तेत आलेले लोकशाहीचे खुनी आम्ही कधीच स्वीकारणार नाही. रोजगार, शिक्षण आणि हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आवाज आज मशालीतून पेटला आहे. ही लढाई आता रस्त्यावरून संसदेत जाईल आणि जनता हुकूमशाही पाडूनच थांबेल.”
या मशाल मोर्चामध्ये हर्षवर्धन सपकाळ, डॉ विश्वजीत कदम, प्रदेश प्रभारी अजय चिकारा, युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे,माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील, अभय छाजेड, अरविंद शिंदे,मोहन जोशी मीडिया विभाग प्रमुख व युवक सरचिटणीस अक्षय जैन, सौरभ अमराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

