पुणे -लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच पत्नीच्या सततच्या त्रासामुळे तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली. पोलिसांनी याबाबत तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नीसह तिच्या आईविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय विजय साळवे (वय २६, रा. गणेशनगर, येरवडा,पुणे) असे आत्महत्या केलेल्या मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी दीपाली अक्षय साळवे (वय २४), तिची आई संगीता अशोक अडागळे (रा. भगवाननगर, गेवराई, जि. बीड) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मयत अक्षय याची आई लक्ष्मी विजय साळवे (वय ५२) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचा दीपालीशी सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर दीपाली आणि तिची आई संगीता यांनी अक्षयला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास वेळोवेळी सांगितले. त्याने वेगळे राहण्यासाठी त्याच्यावर सतत दबाब आणला. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात तक्रारी देखील दिल्या. पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे अक्षयने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे मुलगा अक्षयने आत्महत्या केल्याचे त्याची आई लक्ष्मी साळवे यांनी फिर्यादीत सांगितले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस दळवी पुढील तपास करत आहेत.

