नोएडा -अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईला उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव अश्विनी असे आहे, तो मूळचा बिहारचा आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून नोएडामध्ये राहत होता. आरोपीला नोएडाच्या सेक्टर-११३ येथून पकडण्यात आले. नंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
खरंतर, गुरुवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांना व्हॉट्सअॅपवर एक धमकीचा संदेश मिळाला. त्यात दावा करण्यात आला होता की, लष्कर-ए-जिहादीचे १४ दहशतवादी शहरात आले आहेत. दहशतवादी ३४ वाहनांमध्ये ४०० किलो आरडीएक्स पेरून मोठा स्फोट घडवणार आहेत, ज्यामुळे एक कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो. धमकी मिळताच मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जाहीर केला. गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि इतर सुरक्षा संस्थांनाही सतर्क करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या दहाव्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत २१,००० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जातील, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.
मुंबईतील विविध समुद्रकिनारे, इतर जलकुंभ आणि २०५ कृत्रिम तलावांमध्ये किमान ६,५०० सामुदायिक गणेशमूर्ती आणि १.७५ लाख घरगुती मूर्तींचे विसर्जन केले जाईल. पोलिसांनी मुंबई मनपाच्या मदतीने सुरक्षेची तयारी केली आहे, असे सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले.

