किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने आयोजन ; भारतीय लष्कराला ५०० ढोल-ताशा वादनातून मानवंदना
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय लष्करातील सैनिकांना व त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने पुण्यात ‘तिरंगा फेस्टिवल २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने शुक्रवार, दिनांक १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८ यावेळेत श्री जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौकाजवळ, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर तिरंगा फेस्टिवल २०२५ होणार आहे, अशी माहिती आयोजक किरण साळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा फेस्टिवल पहिल्यांदाच होत आहे. देश रक्षणार्थ प्राणांची बाजी लावणा-या भारतीय सैनिकांच्या पाच वीरपत्नींचा सन्मान तिरंगा फेस्टिवल मध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये वीरपत्नी मीनाक्षी भिसे, राणी चौधरी, सुस्मिता पालेकर, प्रतिभा खटके, दिपाली मोरे यांचा समावेश आहे. तिरंगी उपरणे आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव होणार आहे. सेनाधिकारी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते सन्मान सोहळा होणार असून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र अंतर्गत असलेल्या पुण्यातील ढोल ताशा पथकांतील ५००हून अधिक वादक एकत्रितपणे वाद्यवादन करणार आहेत. ढोल ताशाच्या वादनातून ‘आॅपरेशन सिंदूर’ व ‘आॅपरेशन महादेव’ मधील वीरांना मानवंदना देणार आहेत. संपूर्ण रस्त्यावर तिरंगी ध्वज लावण्यात येणार असून तिरंगी टॅटू यांसह विविध आकर्षण फेस्टिव्हलमध्ये असणार आहेत.
विविध वाद्यांचा सुरेल अविष्कार असलेला ‘नादरंग’ -तालवाद्यकचेरी हा कार्यक्रम देखील होणार आहे. याशिवाय प्रख्यात कलादिग्दर्शक गणेश लोणारे व सहकारी यांचे देशभक्तीपर पथनाट्य व सादरीकरण होणार आहे. ‘वंदे मातरम’ या स्वर मैफलीतून बालकलाकार देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करणार आहेत. तसेच गीततिरंगा/ रामराज्याभिषेक भरतनाट्यम नृत्यावर आधारित सादरीकरण होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सामुदायिक पसायदानाने फेस्टिवलची सांगता होणार आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर हा फेस्टिवलला उपस्थित राहणार असून पुणेकरांनी यामध्ये सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

