अंडरवर्ल्ड प्रमाणेच भाजपमध्ये भरती होत असल्याचा आरोप–महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वस्त्रहरण सुरु
मुंबई-महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे, असे शिवसेनेचे स्पष्ट मत आहे. यांना महाराष्ट्र राज्य सांभाळता येत नाही. काल विधिमंडळात जे झाले, ते जर इतर कोणत्या राज्यात झाले असते किंवा दुसरा कोणी मुख्यमंत्री असता, तर हेच देवेंद्र फडणवीस विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन किंचाळले असते. हे सरकार बरखास्त करुन येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली असती, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन केल्यानंतर माझ्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे, हे त्यांना देखील कळेल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. काल हाणामारी केलेल्यांना मी दोन आमदारांचे समर्थक म्हणणार नाही. समर्थक अशा प्रकारचा हल्ला करत नाही. भाजपच्या आमदार बरोबर जे त्यांचे लोक होते, त्यांचा रेकॉर्ड तपासा, असे आव्हान देखील राऊत यांनी दिले आहे.
राज्यपाल खरेच घटनेचे आणि संविधानाचे रखवालदार असतील तर त्यांनी कालच्या घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायला हवी, अशी मागणी देखील राऊत यांनी केली. काल केवळ चाकू-सुरे असे हत्यारे बाहेर काढायचेच बाकी राहिले होते. त्यांच्या गाडीमध्ये अशा प्रकारचे हत्यारे होती, अशी माझ्याकडे माहिती आहे. जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा हा कट होता, अशी पक्की माहिती माझ्याकडे असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केली आहे.
मकोकाचे आरोपी, दाऊदचे हस्तक, हे विधिमंडळात तुमच्या राज्यात यायला लागले आहेत. उद्या ते विधानसभेत देखील जातील. अशा प्रकारचा गँगवॉर हा सभागृहात देखील होईल. त्याला भारतीय जनता पक्षच उत्तेजन देईल, असा आरोप देखील राऊत यांनी केला. गेल्या दोन महिन्यात भारतीय जनता पक्षात ज्या लोकांची भरती झाली आहे, पूर्वी जशी अंडरवर्ल्ड मध्ये भरती व्हायची, त्या पद्धतीची ही भरती झाली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, पांडव कमजोर होते म्हणून द्रौपदीचे वस्त्रहरण ते उघड्या डोळ्यांनी पाहत होते. तसेच वस्त्रहरण आज महाराष्ट्राच्या संस्कृतीचे होत आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते उघड्या डोळ्यांनी द्रौपदीचे वस्त्रहरण पाहत आहेत. त्याला सर्वस्वी जबाबदार देखील तेच आहेत. कारण ते जुगाराच्या अड्ड्यावर बसलेले आहेत. काल विधिमंडळात झालेले हे गँगवॉर आहे. मकोका, खून, दरोड्यातील आरोपी काल विधानभवनाच्या परिसरात कसे आले? त्यांना कोणी आणले होते? त्यांच्यावर काय कारवाई झाली? असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले.
हनी ट्रॅप प्रकरणावरून देखील प्रश्नचिन्ह-नाशिक आणि इतर जिल्ह्यात झालेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून देखील संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर देवेंद्र फडणवीस काही म्हणाले का? त्यांनी या विषयावर बोलायला हवे होते. असे त्यांनी म्हटले आहे. नाना पटोले, जयंत पाटील यांनी विधानसभेत तर अंबादास दानवे, अनिल परब यांनी परिषदेत अनेकांनी हा विषय विधिमंडळात मांडला आहे. त्यावर सरकार गप्प आहे. कालच्या घटनेवर सरकारचे मत काय? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. या सर्व मुद्द्यांवर विधि मंडळामध्ये आवाज उठवू नये म्हणूनच त्यांना विधानसभेत विरोधी पक्ष नेता पद दिलेले नसल्याचा आरोप राऊत यांनी केला.

