पुणे-जुन्या पिढीतील नामवंत, ऑर्केस्ट्रा विश्वातील प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक आणि ‘दरबार बँड’ चे संस्थापक-संचालक इकबाल दरबार यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते.त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे
ऑर्केस्ट्रा ही संकल्पना महाराष्ट्रात रुजवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये दरबार यांचा मानाचा उल्लेख होतो. त्यांच्या वादनाचे चाहते केवळ पुणे-मुंबईपुरते मर्यादित नव्हते तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही त्यांच्या वादनाने भारावून जात असत.
पुणे महानगरपालिकेत आयोजित एका कार्यक्रमात, ज्यात दिलीपकुमार यांचा सन्मान करण्यात आला होता, त्या वेळी ‘मधुबन में राधिका नाचे रे’ हे गीत इकबाल दरबार यांनी सॅक्सोफोनवर सादर केले. त्यांच्या त्या सादरीकरणाने दिलीपकुमार इतके भारावून गेले की त्यांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली आणि ‘वन्स मोअर’ ची मागणी केली.
इकबाल दरबार यांचे कार्य केवळ संगीतपुरते मर्यादित नव्हते. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सेवाभाव ही त्यांच्या कार्यशैलीची खास वैशिष्ट्ये होती. दरवर्षी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीची सुरुवात त्यांच्या दरबार बँडद्वारे सादर केलेल्या आरतीनेच होत असे. हे केवळ परंपरेचे नव्हे, तर समाजाशी असलेल्या त्यांच्या नात्याचे प्रतीक होते.
त्यांनी सीमेवर जाऊन आपल्या वादनाने भारतीय जवानांचे मनोरंजन केले आणि त्या कार्यक्रमातून मिळालेला निधी कृतज्ञता निधी म्हणून सैन्याला दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘मोहम्मद रफी आर्ट फाउंडेशन’च्या माध्यमातून गरजू कलाकारांना वैद्यकीय आणि आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी ते झटत होते. बँडमधील कलाकार व्यसनमुक्त व्हावेत यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना योग्य वैद्यकीय मदत मिळावी यासाठीही ते अहोरात्र झटले.

