भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन अडचणीत येत असल्याचं वारंवार दिसून येतं. अशातच धाराशिवमध्ये केलेल्या त्या वक्तव्यामुळे महायुतीतील पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. नितेश राणेंच्या वक्तव्याचे पडसाद काल (मंगळवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसून आले. धाराशिव येथील संवाद मेळाव्यात भाषण करताना, नितेश राणेंनी तेथील स्थानिक शिवसेना नेत्यांना उद्देशून बोलताना भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसलेला आहे, असे वक्तव्य केलं त्याला आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला. राणेंच्या वक्तव्याचे पडसाद सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नारायण राणेंचं नाव घेत डिवचलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नारायण राणेंचं नाव घेत नितेश राणेंना डिवचलं, माध्यामांच्या प्रश्नावर उत्तर देताना दानवे म्हणाले, नितेश राणे यांचे बाप नारायण राणे आहेत. हे सगळं असताना देवेंद्र फडणवीस त्यांचे बाप कसे झाले, ते मलाही कळालं नाही.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना इशारा दिला. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असा दमच नितेश राणेंनी दिला होता. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच नितेश राणेंनी स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांना दिली. कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही नितेश राणे म्हणाले होते. त्यावरती शिवसेना नेते व महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही टीका झाली. तर, मंत्रिमंडळ बैठकीतही आज तो विषय निघाला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राणेंना समज दिली.
नितेश राणेंच्या वक्तव्याचे पडसाद काल (मंगळवारी) मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाले. आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला. तसेच, कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, संबंधित मंत्र्यांशी मी बोललो, ते म्हणाले माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, पण मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात जो काही अर्थ असेल त्यापेक्षा जे परसेप्शन जातं ते राजकारणात महत्त्वाचं असतं, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

