संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकात गौप्यस्फोट:मोदींना अटक होऊ नये म्हणून शरद पवार यांनी कॅबिनेटमध्ये कोणती भूमिका मांडली
मुंबई – उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अमित शहा हे देशाच्या राजकारणात राहणार नाही, असा दावा काल केला होता. त्यानंतर आता त्यांच्या या पुस्तकातील काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठे खुलासे केले आहेत. इतकेच नाही तर नरेंद्र मोदी यांना त्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर शरद पवार यांनी देखील मदत केली होती. असा दावा या पुस्तकात करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या पुस्तकामध्ये ‘राजा का संदेश साफ है’ या नावाचे प्रकरण लिहिलेले असल्याची माहिती आता समोर आली आहे. आजपर्यंत कधीही समोर न आलेले अनेक खळबळजनक दावे यामध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन गुजरातचे आमदार अमित शहा यांच्यावर मोठे उपकार केले असल्याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. गुजरात दंगल प्रकरणात सीबीआयचा ससेमिरा अमित शहा यांच्या मागे लागला होता. त्यावेळी त्यांना तडीपार देखील करण्यात आले होते. ही तडीपारी दूर करण्यासाठी अमित शहा हे मातोश्री दरबारी आले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन करून अमित शहा यांना या संकटातून कसे बाहेर काढले, याची माहिती देणारा दावा देखील या पुस्तकात करण्यात आला आहे.
संजय राऊत यांच्या या पुस्तकांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कशाप्रकारे मदत केली याची माहिती देण्यात आली आहे. इतकेच नाही तर गुजरात दंगल प्रकरणात वाचवण्यासाठी शरद पवार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कशा पद्धतीने मदत केली, याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. मोदींना अटक होऊ नये म्हणून शरद पवार यांनी कॅबिनेटमध्ये कोणती भूमिका मांडली. तसेच अमित शहा यांना वाचवण्यासाठी मोदींच्या फोन नंतर शरद पवारांनी कशी सूत्रे हलवली याबाबत देखील या पुस्तकात संजय राऊत यांनी लिहिले आहे.अमित शहा यांच्या मागे सीबीआय तपासाचा ससेमिरा लागल्यानंतर त्यांना बाळासाहेब ठाकरेच मदत करू शकतात, असे कोणीतरी सुचवले होते. त्यामुळे लहान असलेल्या जय शहाला घेऊन अमित शहा हे मुंबईत पोहोचले होते. मात्र कलानगरच्या मुख्य गेटवरच शहा यांना अडवून ठेवण्यात आले होते. बऱ्याच काळ प्रतीक्षा करूनही ठाकरे यांची भेट होत नसल्याने अमित शहा हे घामाघूम झाले होते. असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. मात्र त्या दिवशी बाळासाहेब ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाली नाही. बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी देखील शहा मातोश्रीवर पोहोचले. मात्र शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली. गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण भोगत आहोत, अशी दर्दभरी कहानी अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन केला. त्यानंतर अमित शहा यांची सुटका झाली असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.अमित शहा यांना राजकारणातील प्रवासात आणि जीवनात असलेला प्रमुख अडथळा बाळासाहेब ठाकरे यांनी दूर केला. त्या नंतर अमित शहा यांनी पुढे काय केले, हे सर्व जगाने पाहिले असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी अमित शहा हे निर्घृणपणे वागले असल्याचे देखील आरोप संजय राऊत यांनी या पुस्तकात केले आहे.

