पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर केंद्राने देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वच राज्यांना यासंबंधीचे दिशानिर्देश दिलेत. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारही यासंबंधीची पाऊले उचलत असताना राज्यातील 48 शहरांत तब्बल 5023 पाकिस्तानी नागरिक आढळल्याचा दावा राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे.
अमित शहा यांच्या आदेशानंतर राज्यातील पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. त्यात राज्यातील 48 शहरांत 5023 पाकिस्तानी नागरीक आढळलेत. यापैकी 107 जण बेपत्ता असून, त्यांचा कोणताही पत्ता तपास यंत्रणांना लागत नाही. राज्यात सर्वाधिक 2458 पाकिस्तानी नागपूर शहरात आढळलेत. त्यानंतर ठाण्यात 1106, तर मुंबईत 14 पाकिस्तानी राहत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे यापैकी केवळ 51 पाक नागरिकांकडेच वैध दस्तऐवज आढळलेत.
योगेश कदम म्हणाले, आजमितीस महाराष्ट्रात 5 हजार 23 पाक नागरीक आहेत. यातील एक कॉलम अनट्रेसेबल पाक नागरिकांचा आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. भारतीय यंत्रणांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवायचे आहे. पण त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही. तूर्त सार्क व्हिसा व शॉर्ट टाईम व्हिसावर आलेल्या पाक नागरिकांना 2 दिवसांत म्हणजे 28 तारखेपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले.
जे पाकिस्तानी वैद्यकीय उपचारांसाठी येथे आलेत. त्यांना 2 दिवस वाढवून देण्यात आलेत. त्यांनी 30 तारखेपर्यंत भारत सोडायचा आहे. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करणे अजून सुरू असल्यामु्ळे या आकडेवारीत बदल होऊ शकतो, असेही योगेश कदम यांनी याविषयी बोलताना सांगितले.
खाली वाचा कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी?
अकोला 22
अहिल्यानगर 14
अमरावती 118
छत्रपती संभाजीनगर 59
भंडारा 0
बीड 0
बुलढाणा 7
चंद्रपूर 0
धुळे 6
धाराशिव 0
गडचिरोली 0
गोंदिया 5
हिंगोली 0
जळगाव 393
जालना 5
कोल्हापूर 58
लातूर 8
मुंबई 28
नाशिक 10
नागपूर 2458
नांदेड 4
नंदुरबार 10
नवी मुंबई 239
परभणी 3
पालघर 1
पिंपरी चिंचवड 290
पुणे 114
रायगड 17
रत्नागिरी 4
सातारा 1
सांगली 6
कोल्हापूर ग्रामीण 17
सोलापूर 0
सिंधुदुर्ग 0
ठाणे 1106
वर्धा 0
वाशिम 6
यवतमाळ 14
एकूण 5023

