पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे–देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
पहलगाम : जम्मू-काश्मीरच्या अति-पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. द रेसिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात किमान २७ पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि पुण्यातील पर्यटकांवर देखील हल्ला झाला असून पुण्यातील कर्वेनगरमधील दोन कुटुंबातील पुरुषांना गोळ्या चाटून गेल्या आहेत, त्यामुळे ते जखमी झाल्याचे वृत्त आहे . गनबोटे आणि जगदाळे कुटुंबाची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुणे आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचे नातेवाईक प्रचंड काळजीत पडले असून आपापल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते.
आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे यांच्यावर हा हल्ला झाला आहे. ही कुटुंब मुळची बारामती तालुक्यातील असून सध्या पुण्यात कर्वेनगरमध्ये वेदान्त नगरीजवळ राहात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यातील संतोष आणि कौस्तुभ यातील एकाच्या अंगाला गोळ्या लागल्या आहेत. हल्ला दुपारी १२ वाजेच्या सुमारास ‘बैसारन’ नावाच्या हिरव्यागार कुरणाजवळ झाला. येथे देशाच्या विविध भागांतील पर्यटक फिरण्यासाठी आले होते. अचानक अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पर्यटकांवर बेधुंद गोळीबार सुरू केला. आधी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारण्यात आले. त्यानंतर त्यांना गोळ्या घालण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. गोळ्यांच्या आवाजाने परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी पळापळ सुरू केली. जखमींना तात्काळ अनंतनाग व श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरक्षा दलांनी परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली आहे.मृतांमध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईमधील पर्यटक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून काही पर्यटक गुजरातमधील सूरतमधील आहेत. तर, उर्वरित पर्यटक हरियाणा आणि दिल्ली येथून आले होते, असे यंत्रणांकडून सांगण्यात आले. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे आणि जखमींना शक्य तेवढी वैद्यकीय मदत देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शाह यांच्याशी फोनवर चर्चा करून तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करीत ओमर अब्दुल्ला यांना याविषयी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले. तसेच, जगदाळे आणि गणबोटे कुटुंबावर हल्ला झाल्याची माहिती दिली.
टीआरएफ ही लष्कर-ए-तोयबाची संलग्न दहशतवादी संघटना असून गेल्या काही वर्षांत या संघटनेने अनेक नागरिकांवर आणि बाहेरून आलेल्या कामगारांवर हल्ले केले आहेत. धर्माच्या आधारे पर्यटकांवर थेट हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे आणि यामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. जगदाळे आणि गनबोटे कुटुंबाच्या मी संपर्कात आहे. यासोबतच महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या आणि मदतीच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कौस्तुभ यांच्या मुलीशी माझा संपर्क झाला आहे. त्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय व अन्य मदत, उपचार दिले जात आहेत. या मुलीसमोरच तिच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कडक शब्दांत याची निंदा केली आहे. आवश्यक ती सर्व कडक कारवाई केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरमध्ये रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आम्ही काळजीने सर्व गोष्टी करीत आहोत.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला-पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तीव्र दुःख आणि दुःख व्यक्त केले आहे.
या हल्ल्याला “घृणास्पद” असे वर्णन करून, मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करणे हे क्रूरता आणि अमानुषतेचे कृत्य आहे.”आमच्या पर्यटकांवर झालेला हा हल्ला घृणास्पद आहे. या हल्ल्याचे गुन्हेगार प्राणी आहेत – अमानवी आणि तिरस्कारास पात्र आहेत. निषेधाचे कोणतेही शब्द पुरेसे नाहीत,” असे मुख्यमंत्री यांनी एका कडक शब्दात म्हटले आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती व्यक्त केली आणि जखमींच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना केली.मुख्यमंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत आणि आरोग्यमंत्री सकिना इटू यांच्याशी बोलले आहेत, ज्या जखमींवर उपचार आणि व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.
त्यांनी पुढे जाहीर केले की ते परिस्थितीचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करण्यासाठी आणि पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व शक्य ती मदत मिळावी यासाठी तात्काळ श्रीनगरला परतणार आहेत.”मी माझ्या सहकाऱ्याशी बोललो आहे
@sakinaitooआणि ती जखमींच्या व्यवस्थेची देखरेख करण्यासाठी रुग्णालयात गेली आहे. मी ताबडतोब श्रीनगरला परत जाईन,” असे ते म्हणाले.तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम पर्यटन रिसॉर्टमधील दुःखद घटनेबद्दल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवर बोलले.