संभाजीनगर- जितेंद्र आव्हाड यांनी श्री रामांविषयी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. आम्ही त्याचे समर्थन करणार नाही. पण चतुर्थीच्या दिवशी जे मटण खातात, कोंबड्या कापतात, त्यांनी आम्हाला कोणतीही गोष्ट शिकवू नये. गोमांसाचे समर्थन करणाऱ्यांनी जरा स्वतःच्या पक्षाचे नेते काय बोलले हे आठवावे, अशा शब्दांत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या एका वादग्रस्त विधानावरून आकांडतांडव करणाऱ्या भाजपचा समाचार घेतला आहे.
राम बहुजनांचा आहे. तो शिकार करून मांसाहार करत होता, असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटलेत. भाजपने या प्रकरणी राज्यात विविध शहरांत आंदोलन सुरू केले आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी आव्हाड यांच्या विधानाचा निषेध करत भाजपला त्यांच्या नेत्यांनी गोमांसाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांची आठवण करून दिली.
अंबादास दानवे म्हणाले की, आम्ही जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. त्याविरोधात रस्त्यावर उतरण्याची गरजही वाटत नाही. पण प्रभू श्रीरामचंद्रांविषयी बोलताना काळजी घेतली पाहिजे. प्रभू श्रीराम आदर्श आहेत. आदर्शपुरुष व महापुरुष म्हणून देशात त्यांचा सन्मान होतो. त्यामुळे आदर्शांविषयी बोलताना तोंड सांभाळले पाहिजे.
यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरून आंदोलन करणाऱ्या भाजपलाही खडेबोल सुनावले. गोमांसाचे समर्थन करणाऱ्या भाजपने हिंदुत्वाच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. गोमांसाविषयी गोव्याचे मु्ख्यमंत्री व केंद्रीय मंत्री किरण रिजीजू काय बोलले होते हे आम्हाला माहिती आहे, असे ते म्हणाले.
तुम्ही सर्वांनी मांसाहार सोडला आहे का? सध्या मांसाहार करणारेही आंदोलन करतात. गणपतीच्या दिवशी मांसाहार करत असल्याचे कित्येक आंदोलकांच्या घरांत पाहिले आहे. चतुर्थीच्या दिवशीही मांसाहार करणारे आम्ही पाहिलेत. चतुर्थीच्या दिवशी मटण खाणारे व कोंबड्या कापणारे आम्हाला काय शिकवणार? असा हल्लाबोलही अंबादास दानवे यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधताना केला.