पुणे- रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर आता काँग्रेसला पुण्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मातब्बर नेते आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे देखील काँग्रेसची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. संग्राम थोपटे हे 22 एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संग्राम थोपटे यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिला नाही. ते सध्या आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत असून चर्चेनंतर रविवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.संग्राम थोपटे हे राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा हा कारखाना अडचणीत असल्याची माहिती आहे. या कारखान्याला राज्य सरकारने 80 कोटींचे मार्जिन लोन मंजूर केले होते. पण लोकसभेत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधाने त्यांच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती. आता या कारखान्याला मदत मिळण्यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संग्राम थोपटे हे काँग्रेसचे नेते असून भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघांमधून सलग तीन वेळा आमदार झालेले आहेत. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी सहा वेळा भोर विधानसभेचे नेतृत्व केले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांना 20 हजार मतांनी पराभूत केले होते.
संग्राम थोपटे हे भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. रविवारी राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. येत्या 22 एप्रिल रोजी ते भाजपात प्रवेश करतील. मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होईल, असे सांगितले जात आहे.
संग्राम थोपटे यांना राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांना राजकारणाचे बाळकडू वडिलांकडूनच मिळाले. संग्राम थोपटे हे 2002 ते 2003 या काळात भोर पंचायत समितीचे उपसभापती होते. 2007 ते 2024 या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहिलेले आहेत. याशिवाय ते याच काळात भोर येथील राजगड सहकारी साखर कारखाना अनंतनगर निगडेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. तसेच त्यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी लढवली होती. या निवडणुकीत ते जिंकून आले होते. यानंतर 2014 आणि 2019 अशी सलग तीनवेळा विधानसभा निवडणूक जिंकले होते.

