ये शेर का बच्चा है. …
एकनाथ शिंदे यावेळी ठाकरे गटावर अक्षरशः तुटून पडले. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काही दिवसांवर एकनाथ शिंदे यांच्यावर केंद्राच्या नोटीसीला घाबरून भाजपसोबत पळून गेल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाचा धागा पकडत शिंदे म्हणाले, या लोकांनी सत्तेसाठी औरंगजेबी विचार स्वीकारले. पण आम्ही तुमचा टांगा पलटून टाकला. हे करायला वाघाचे काळीज लागते. लांडगा वाघाचे कातडे पांघरून वाघ होत नाही. तो लांडगाच राहतो. त्यासाठी वाघाचे काळीज लागते.एकनाथ शिंदे म्हणाले, ये शेर का बच्चा है. आम्ही 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. आम्ही लढून जिंकू किंवा लढून शहीद होऊ या निर्धाराने निवडणूक लढली. अनिल परब तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कोण नोटिसीला घाबरून कुठे गेले हे मला माहिती आहे. मी कमरेखाली वार करत नाही. तुम्हाला नोटिस आल्यानंतर तुम्ही कुठे गेला होता हे ही मला माहिती आहे. मला जोपर्यंत कुणी डिवचत नाही, तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही. सचिन अहिर तुम्हाला बरेच काही माहिती आहे. मी खुर्चीसाठी काहीच केले नाही. मी स्वतः अमित शहा आणि नरेंद्र मोदींना फोन करून सांगितले तुम्ही सांगाल तो निर्णय मला मान्य असेल.
मुंबई-नागपूर येथे घडलेल्या हिंसाचाराबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत निवेदन दिले. नागपूरमध्ये सोमवारी नेमके काय घडले? याची माहिती देत असताना त्यांनी अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानाचा उल्लेख करत त्यांच्यावरही टीका केली. तसेच विधानपरिषदेतील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. यानंतर त्यांनी आक्रमक होत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर जोरदार टीका केली. “२०२२ साली मी लपूनछपून काहीही केले नाही, जे केले ते निधड्या छातीने केले. पण तुमचे नेते (ठाकरे गट) लपूनछपून भाजपा श्रेष्ठींना भेटून आले. युती करू असे म्हणाले. पण पुन्हा पलटले”, असी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
शिवसेनेचे (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वीच विधानपरिषदेत बोलत असताना माझा छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच छळ झाला होता, असे म्हटले होते. पक्ष बदलण्यासाठी माझा छळ झाला. पण जसे छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही, तसा मी पक्ष बदलला नाही, असे ते म्हणाले होते. याचा संदर्भ देत एकनाथ शिंदे म्हणाले, “तुमचा काय छळ झाला होता? तुमच्यावर कारवाई झाल्यानंतर तुम्हीही लोटांगण घातले होते, ही मला माहीत आहे. पण प्रकरणातून सुटका झाल्यानंतर तुम्ही तुमच्या नेत्यांप्रमाणेच पलटी मारली.”एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले, “छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारले. त्यांचे डोळे काढले, जीभ हासडली, कातडी सोलली, त्यावर मिठ चोळले, अशाप्रकारचे तुमच्यावर (विरोधक) अत्याचार झाले का? तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी युती तोडली. तसेच महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपाच्या चार नेत्यांना तुरुंगात टाकून त्यांचे आमदार फोडण्याचा तुमचा कट होता. पण मी युतीधर्मासाठी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी तुमचा टांगा पलटी केला. मी जे केले, ते उघडपणे केले. ज्याची जगातील ३३ देशांनी दखल घेतली. एकनाथ शिंदे कोण आहे, हे ३३ देशांमध्ये सर्च केले गेले.”दरम्यान नागपूर दंगलीबाबत बोलत असताना त्यांनी विधानसभेत दिलेली माहितीच पुन्हा दिली. ही दंगल पूर्वनियोजित होती, असे प्रत्यक्षदर्शींकडून पुरावे मिळत असल्याचे ते म्हणाले. दंगल झालेल्या भागात एकेठिकाणी दररोज १००-१५० दुचाकी उभ्या असतात. मात्र दंगलखोरांची एकही दुचाकी काल त्याठिकाणी नव्हती. पेट्रोल बॉम्ब, लाठ्या, तलवारी इतक्या मोठ्या प्रमाणात अचानक कशा काय जमवल्या? यासाठी आधीच नियोजन केले गेले असावे, असा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली
एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना या लोकांनी देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा कट रचला होता. यांनी औरंग्याचे विचार घेतले, मात्र मी बाळासाहेबांना सोडले नाही. त्यामुळे माझ्यासोबत 60 लोक आले. मी हिंदुत्वाचे सरकार आणले. तुम्हाला फक्त 20 लोक निवडून आणता आले. यावरून जनतेचा कौलही आमच्याच बाजूने असल्याचे स्पष्ट होते.
एक अंदर की बात सांगतो ह्यांचे प्रमुख मोदींना भेटायला गेले आणि मला वाचवा म्हणून माफी मागू लागले. अनिल परब तुम्ही देखील दिल्लीला गेला होतात आणि तिथे जावून माफी मागितली. त्यानंतर राज्यात माघारी येऊन पलटी मारली.

