सर्वपक्षिय शोकसभेत नगरसेवक विजय शेवाळे यांना मान्यवरांची श्रद्धांजली
पुणे ता. 28:- नगरसेवक विजय शेवाळे यांच्या निधनामुळे फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जण्याने आपण एका क्रियाशील नेतृत्वाला गमावलो आहे. असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले.
औंधरोड येथील कै.बाबुराव गेनबा शेवाळे रुग्णालय येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते. भाजप शहर चिटणीस सुनील माने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी भाजप शहर वरिष्ठ उपाध्यक्ष योगेश बाचल, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजप शहर सरचिटणीस गणेश घोष, नगरसेवक प्रकाश ढोरे, अर्चना मुसळे, ज्योती कळमकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भागसंघचालक दिलीप परब, माजी नगरसेवक आंनद छाजेड, ॲड.मधुकर मुसळे,राष्ट्रवादीचे खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे अध्यक्ष बाळासाहेब आहेर, विजय जाधव, काँग्रेस ब्लॉक कमिटी अध्यक्ष राजेश बुथाडा, ज्योती परदेशी,भाजपचे सौरभ मुंडलीक, अनिल भिसे, सामाजिक कार्यकर्ते शंकर तडाखे,स्वप्नील कांबळे यांच्यासह मान्यवरांनी नगरसेवक शेवाळे यांना श्रद्धांजली वाहिली.
आमदार शिरोळे म्हणाले, विजयरावांचा चेहरा सतत हसरा होता. नगरसेवक झाल्यानंतर ते अत्यंत खुश होते. खऱ्या अर्थाने त्यांनी नगरसेवक पद जगले. आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांनी लोकांच्या सेवेसाठी व्यथित केला. फुलपाखराप्रमाणे लाभलेल्या अल्पायुष्यात त्यांनी सर्वांसाठी आनंदाची उधळण केली.
योगेश बाचल यांनी विजय शेवाळेंच्या अकाली जाण्याने दिलदार स्वभावाचा, सच्चा कार्यकर्ता निघून गेल्याची, तर गणेश घोष यांनी सामान्य कार्यकर्त्यांसोबत काम करणारा जिज्ञासू माणूस निघून गेला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
सुनील माने यांनी, विजयराव जसे पैशाने श्रीमंत होते तसेच ते माणूस म्हणून ही सर्वोत्तम होते. त्यांना मानणारे सर्वपक्षिय कार्यकर्ते, सामान्य नागरिक यांच्यातून त्यांची खरी श्रीमंती समजून येते. अशा भावना व्यक्त केल्या.
प्रकाश ढोरे यांनी निखळ मित्र निघून गेल्याचे सांगत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांचे अपूर्ण राहिलेलं समाजकार्य पूर्ण करून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देणार असल्याचे सांगितले.ज्योती कळमकर यांनी नगरसेवक म्हणून काम करताना त्यांचे मार्गदर्शन सतत लाभत होते अशा एका मार्गदर्शकाला आम्ही मुकल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीचे बाळासाहेब आहेर त्यांच्या आठवणी जागवताना म्हणाले, विजयराव राजकारण विरहित काम करणारा नेता होता. कार्यकर्त्याला नेहमी उच्च स्तरावर नेण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे.
काँग्रेसचे राजेश बुथडा यांनी त्यांच्या जण्याने औंध बोपोडी परिसर एका उमद्या नेतृत्वाला मुकला असल्याची भावना व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्ते शंकरराव तडाखे यांनी सामान्य लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारा नेता आमच्यामधून निघून गेला असल्याचे सांगत त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली.