पुणे, २८ ऑगस्ट २०२०- क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता शोधून त्यांच्या विकासासाठी लक्षपूर्वक कार्य करणाऱ्या पुण्यातील “लक्ष्य” या संस्थेचा राष्ट्रीय क्रीडा दिनी खेल प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. खेळाडू आणि त्याचा विकास हेच एकमेव उद्दिष्ट बाळगून गेले दशकभर लक्ष्य ही संस्था आपले काम करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल अलिकडेच केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने आपल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात घेत, त्यांना खेल प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता.
खेळ आणि त्यात कारकिर्द घडवू पाहणाऱ्या खेळाडूंसाठी काहीतरी करण्यासाठी पुण्यातील काही क्रीडा प्रेमी एकत्र आले आणि त्यांच्या पहिल्याच बैठकीत यासाठी लक्ष्य ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी स्वयंसेवी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या क्रीडा प्रेमींनी २०१० मध्ये हा संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि तेव्हापासून आज दहा वर्षे ही संस्था आपल्या निश्चयापासून तसूभरही ढळली नाही. खेळाडूंची गुणवत्ता तपासून त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित करणे हे उद्दिष्ट या संस्थेने सुरवातीपासूनच बाळगले. खेळाडूंच्या पाठीशी त्यांचे पालक असतात यात शंकाच नाही. पण, कारकिर्द घडवण्यासाठी बाहेर पडल्यावर त्यांच्यामागे प्रत्येक पालक खंबीरपणे उभे राहू शकत नाही. लक्ष्यने हेच काम केले आणि गुणवाने खेळाडूंना आर्थिक मदतीचा हात देत त्यांच्या मागे जबाबदार पालकाप्रमाणे खंबीर उभी राहिली. आतापर्यंत विविध आठ क्रीडा प्रकारातील शंभरहून अधिक खेळाडूंची ही संस्था पालक बनली आहे. यामध्ये ऑलिंपियन राही सरनोबत, शरथ कमाल, मनिका बात्रा, अश्विनी पोनप्पा अशा खेळाडूंचा समावेश आहे.क्रीडा जगतात लक्ष्यच्या या कार्याचे कौतुक होत होतेच. पण, आता त्यावर शासकीय शाबासकी देखील पडली.
या सन्मानाविषयी बोलताना लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “हा पुरस्कार स्विकारताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या कार्याची दखल घेण्यात आली याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या कार्याची ही पावतीच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडू पदके मिळवू शकतील का ?असा प्रश्न ऐरणीवर होता. दहा वर्षापूर्वी आम्ही एकत्र आलो तेव्हा आमच्या चर्चेतही हा विषय आला. पण, त्याचवेळी देशातील गुणवत्तेला योग्य पद्धतीने प्रोत्साहन मिळाले, तर आपले खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर उभे राहू शकतात आणि पदक मिळवू शकतात असा विश्वासही वाटत होता. या एकाच विश्वासाच्या जोरावर आम्ही कार्यरत झालो आणि आज आमच्या कार्याचा होत असलेला सन्मान पाहून आम्ही अधिक उत्साहित झालो आहोत. भविष्यातही आम्ही खेळाडूंच्या पाठिशी याहून अधिक भक्कमपणे उभे राहू.”
आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेती राही सरनोबत ही आमच्या प्रवासातील पहिली खेळाडू म्हणता येईल. राहीच्या या कामगिरीने राही २०१२ ऑलिंपिकसाठी पात्रता सिद्ध करू शकली. राहीप्रमाणेच मम्पी दास या युवा नेमबाज खेळाडूला प्रोत्साहित करण्यातही लक्ष्यची साथ होती. लक्ष्यचा साथीमुळे ती केवळ खेळातच प्रगती करू शकली नाही, तर तिने आपल्याला घडवण्यासाठी आईला गहाण टाकलेले दागिनेही सोडवून घेतले. लक्ष्यने खेळाडूंनी केवळ आर्थिक मदत केली नाही, तर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांचीदेखील काळजी घेतली. त्यामुळे देशात खेळाला पूरक असे वातावरण निर्माण होण्यास मदत मिळाली. त्यामुळेच लक्ष्य ही संस्था खऱ्या अर्थाने देशातील खेळ आणि खेळाडूंचा विचार करणारी पालक आहे असे म्हणायला जागा आहे.
लक्ष्यचे सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, “खेळात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे प्रत्येक खेळाडूचे उद्दिष्ट असते. पण, या खेळाडूंसाठी अनुकूल वातावरण निर्मीती होणे देखील गरजेचे असते. खेळाडू फक्त आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करू शकतील असे वातावरण तयार झाल्यास आपले खेळाडू भक्कमपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री होती. आम्ही खेळाडूंसाठी आर्थिक मदत उभी करताना त्यांचा सरावाचा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घेतली. अंकिता रैना आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हती. याचे कारण म्हणजे तिची काळजी घेण्यासाठी तिच्या आईला आपल्या नोकरीत तडजोड करावी लागत होती. अंकिता पुण्याला सराव करत असल्यामुळे आम्ही तिच्या आईची पुण्यात बदली करण्यासाठी प्रयत्न केले. यात यश आल्यावर अंकिता देखील आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करू शकली आणि तेव्हापासून तिने मागे वळून बघितले नाही.”
प्रशिक्षणापासून पूरक आहार ते खेळाडूंच्या मानसिकतेपर्यंतचे मार्गदर्शन पुरविण्याचा लक्ष्यचा आग्रह असतो. त्यामुळे खेळाडूंचे खऱ्या अर्थाने पालनपोषण करणारी संस्था म्हणून या संस्थेकडे बघितले जाते.
लक्ष्यच्या प्लेअर मॅनेजमेंटचे मुख्य व ग्रॅंडमास्टर अभिजीत कुंटे म्हणाले की, “सध्या लक्ष्य विविध आठ क्रीडा प्रकारातील ३५ खेळाडूंना पाठिंबा देत आहे. यात २०२१ ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली मुष्टीयुद्धपटू पूजा राणी, सिमरजीत कौर, कुस्तीपटू सुनील कुमार, बुद्धिबळपटू विदीत गुजराथी या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. आमच्या या प्रवासात आम्हांला सहकार्य करणाऱ्या सर्व प्रायोजकांचे आम्ही आभारी आहोत. भविष्यातही ते असेच आमच्याबरोबर राहतील अशी आम्हाला आशा आहे.”
खेळ म्हटले की जशी संघ भावना महत्वाची असते, तसेच खेळाडूंच्या पाठिशी उभे राहताना लक्ष्य चा देखील एक संघ आहे. खेळाडूंना प्रोत्साहन या एकमेव उद्दिष्टाने ते झपाटून गेले आहेत. या सर्वांशिवाय लक्ष्य संस्था उभीच राहू शकली नसती. यामध्ये संस्थापक अध्यक्ष मनीष जैन, उपाध्यक्ष स्वस्तिक सिरसीकर, आशिष देसाई, सहसचिव अमेय येरवडेकर, खजिनदार भरत शहा, सदस्य रितू नाथानी, सत्येन पटेल, नरेंद्र फिरोदिया, मनिष मेहता यांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. देशात क्रीडा क्रांती घडविण्यासाठी आणि देशाचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी आम्ही यापुढेही कटिबद्ध असू.
राष्ट्रीय क्रीडा दिनी म्हणजे उद्या शनिवारी (ता.२९) नवी दिल्ली येथून आभासी पद्धतीने होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात ”लक्ष्य”चा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येईल. कोरोनाच्या संकटामुळे हा सोहळा यावेळी आभासी पद्धतीने होणार आहे.